संगमनेर, प्रतिनिधी:
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या जीवनात आनंद निर्माण करत उच्चांकी भाव दिला आहे. आता महाराष्ट्रात ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याने, कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रात ऊस वाढ कार्यक्रमांतर्गत नवीन AI वापरासाठी प्रात्यक्षिक प्लॉट तयार करण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी केले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीबद्दल अधिक माहिती देताना घुले म्हणाले की, जागतिक स्तरावर शेती, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये AI चा वापर वाढला आहे. ऊस शेतीमध्ये बारामती ॲग्रीकल्चर ट्रस्टने या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला आहे. या प्रणालीमुळे जमिनीच्या पोतानुसार आवश्यक खते, उसावर आलेली बुरशी, आणि कीटकनाशकांचा वापर याबाबतची माहिती तात्काळ शेतकऱ्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होईल.
त्याचबरोबर, उसाच्या फुटव्यांची संख्या आणि त्यांची वाढ समान ठेवण्यात यश मिळेल. प्रायोगिक तत्त्वावर असे सिद्ध झाले आहे की, या पद्धतीमुळे अंदाजे ऊस उत्पादनात 30 ते 40 टक्के वाढ होते, पाण्याची 30 टक्के बचत होते, तर खते, रोग आणि कीड नियंत्रण औषधांच्या खर्चात 40 ते 50 टक्के बचत होते.

थोरात कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करण्यासाठी 25 शेतकऱ्यांचे समूह गट तयार करण्यात येणार आहेत. गटनिहाय ऊस पीक प्रात्यक्षिक प्लॉट तयार करण्यात येतील, यात त्या भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक सहभाग असेल. ही प्रणाली पूर्व हंगाम आणि सुरू हंगामासाठी उपलब्ध असेल. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शेतकरी नियमित ऊस पिकवणारा असावा, अँड्रॉइड मोबाईल वापरणारा असावा आणि दिलेल्या सूचनांचे पालन करणारा असावा. तसेच, भरपूर पाणी उपलब्ध असले तरी ठिबक सिंचनाचा वापर करणे अनिवार्य असेल.
याबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या शेती व ऊस विभागाशी संपर्क साधावा किंवा गट ऑफिसमध्ये आपली नावनोंदणी 20 जुलै 2025 पर्यंत करावी, असे आवाहन सर्व संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक मंडळांनी केले आहे.


