

मुंबई:
नगर पालिका हद्दीत आणि हद्दीलगत नागरी वस्तीत लागू असलेल्या तुकडाबंदी कायद्यामुळे बाधित झालेल्या लाखो कुटुंबांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १ जानेवारी २०२५ पर्यंत झालेले सर्व तुकडाबंदी व्यवहार नियमित केले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. आमदार अमोल खताळ यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला.
सद्यस्थितीत तुकडाबंदी कायद्यामुळे एक किंवा दोन गुंठे जागा घेतलेल्या नागरिकांना बांधकाम करण्यास किंवा त्या जागांचे व्यवहार करण्यास अडचणी येत होत्या. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, महसूलमंत्री बावनकुळे यांनी महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगर पंचायत क्षेत्राच्या हद्दीत व हद्दीलगत तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन झालेल्या भागांमध्ये १ जानेवारी २०२५ पर्यंत झालेल्या व्यवहारांसाठी नियम शिथिल करण्याची घोषणा केली.

या संदर्भात, तुकडाबंदी कायद्यासाठी निश्चित मार्गदर्शक प्रणाली तयार करण्यासाठी राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, मुद्रांक आयुक्त, जमाबंदी आयुक्त आणि नगरविकास सचिव यांची एक समिती नेमण्यात आली आहे. ही समिती येत्या पंधरा दिवसांत याबाबतचा अहवाल सादर करेल.
या निर्णयाबद्दल आमदार अमोल खताळ यांनी महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे तसेच जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले. महायुती सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.


