संगमनेर, प्रतिनिधी:
गुरु पौर्णिमेचा दिवस संगमनेरकरांसाठी धक्कादायक आणि दुःखदायक ठरला आहे. संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान आज घडलेल्या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला. गटारात काम करत असताना गटारीमध्ये निर्माण झालेल्या विषारी वायूच्या संपर्कात आल्याने बेशुद्ध पडून अतुल रतन पवार या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच त्या पाठोपाठ या दुर्घटनेतील दुसऱ्या जखमीचा हे मृत्यू झाल्याचे दुःखद वृत्त समोर आले आहे.
रियाज जावेद पिंजारी असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून गटारीच्या (ड्रेनेज) कामावेळी विषारी वाळूच्या संपर्कात आल्याने बेशुद्ध होऊन जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न या तरुणाने केला होता. मात्र हा तरुण देखील वायूच्या संपर्कात आल्याने तो देखील जखमी झाला. उपचारादरम्यान त्याची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्याचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात त जखमी झालेल्या तिसऱ्या व्यक्तीवर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान डॉ. जयश्री थोरात यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.
अतुल रतन पवार व रियाज जावेद पिंजारी या दोघांचा मृत्यू झाल्याने संगमनेरमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या दोघांच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणे काम करणाऱ्या ठेकेदारावर व त्याला सहाय्यभूत ठरणाऱ्यावर यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिक व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून होत आहे. आमदार अमोल खताळ यांनी देखील संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश स्थानिक पोलिसांना दिले आहे.
दरम्यान या दुर्घटनेनंतर संगमनेरकरांमध्ये प्रशासना विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी संगमनेरकरांची पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
घटनेची माहिती मिळताच माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, निखिल पापडेजा आदींसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तर महायुतीच्या ॲड. श्रीराम गणपुले, ॲड. संग्राम जोंधळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
तर आमदार अमोल खताळ यांनी देखील या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान या कामाचा ठेका दिलेला ठेकेदार, स्वच्छतेसाठी काम करणारा ठेकेदार आणि मुख्याधिकारी यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असून शहर पोलीस याप्रकरणी नेमक कोणावर गुन्हा दाखल करतात हे लवकरच समोर येणार आहे.
गटार दुर्घटनेतील आणखी एकाचा मृत्यू, मृतांची संख्या दोनवर; संगमनेरकरांसह महाविकास आघाडी व महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्यात धाव… उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू, संगमनेरात शोकाकुल वातावरण
रियाज जावेद पिंजारी असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे





दरम्यान या दुर्घटनेनंतर संगमनेरकरांमध्ये प्रशासना विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले
