
संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारूप प्रभाग रचनेत आणि निर्वाचक गण रचनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा गंभीर आरोप पंचायत समितीचे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) सरूनाथ सुखदेव उंबरकर यांनी केला असून या संदर्भात जिल्हाधिकारी (जिल्हा निवडणूक अधिकारी) यांच्याकडे हरकत अर्ज दाखल केला आहे. २१ जुलै २०२५ रोजी संगमनेर तहसील कार्यालयात हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
उंबरकर यांनी आपल्या हरकतीमध्ये म्हटले आहे की, संगमनेर तहसीलदार यांनी प्रारूप प्रभाग रचना आणि निर्वाचक गण रचना करताना शासकीय नियमांचे आणि राज्य निवडणूक आयोगाच्या ४ ऑक्टोबर २०११ च्या निर्देशांचे उल्लंघन केले आहे. आयोगाच्या निर्देशानुसार, निवडणूक विभाग/निर्वाचक गण रचना उत्तर दिशेकडून सुरू करून ईशान्येकडे जावी, त्यानंतर पूर्वेकडे येऊन पश्चिमेकडे सरकावे आणि शेवट दक्षिणेत करावा. मात्र, या निर्देशांचे पालन न करता राजकीय दबावापोटी ही रचना केली असल्याचा आरोप उंबरकर यांनी केला आहे.

याव्यतिरिक्त, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेताना प्रारूप प्रभाग रचना आणि निर्वाचक गण रचना पूर्वीची जशी आहे तशी ठेवून, आरक्षण काढून ४ महिन्यांत निवडणुका घ्याव्यात, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने २०२५ च्या निकालपत्रात दिला असल्याचेही हरकतीत नमूद करण्यात आले आहे. संगमनेरचे तहसीलदार (निवडणूक निर्णय अधिकारी) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचा अवमान केल्याचे उंबरकर यांनी म्हटले आहे. तसेच, तालुक्यातील भौगोलिक रचना आणि गाव-शिवारस्त्यांचा विचार न करता ही रचना करण्यात आली असून, केवळ राजकीय नेत्यांना खुश करण्यासाठी अधिकारांचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याचेही उंबरकर यांनी म्हटले आहे.
उंबरकर यांनी असेही म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेताना जिल्हा परिषद व पंचायत समितीचे गटनिहाय व गणनिहाय आरक्षण सोडत काढून त्याचवेळी प्रारूप प्रभाग रचना व निर्वाचक गण रचना तयार करून नवीन आराखड्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व नियमांनुसार तहसील कार्यालयात आरक्षण व प्रभाग रचना एकाचवेळी प्रसिद्ध करावी लागते. मात्र, संगमनेर तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आदेशांचे व नियमांचे उल्लंघन केले आहे.
उंबरकर यांनी स्वतः राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद गट क्रमांक ८ – तळेगाव, जिल्हा परिषद गट ९ – आश्वी बु., जिल्हा परिषद गट १० – जोर्वे या तीन जिल्हा परिषद गटांची तसेच पंचायत समिती निर्वाचक गण क्रमांक १५ – तळेगाव, १६ – वडगाव पान, १७ – आश्वी बु., १८ – आश्वी खु., १९ – जोर्वे, आणि २० – आंभोरे या सहा पंचायत समिती निर्वाचक गणांची योग्य प्रारूप प्रभाग रचना व निर्वाचक गण रचना तयार केली असून ती जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली आहे.
उंबरकर यांच मूळ गाव उंबरी बाळापूर पूर्वी आश्वी बु. जिल्हा परिषद गट आणि आश्वी बु. पंचायत समिती गणात होता. ते २०१२-२०१७ या वर्षासाठी आश्वी बु. पंचायत समिती गणातून निवडून आले होते आणि ५ वर्ष पंचायत समिती सदस्य म्हणून काम केले आहे. मात्र, राजकीय हेतूने उंबरी बाळापूर गाव आश्वी बु. पंचायत समिती गणातून वगळून जोर्वे जिल्हा परिषद गट व जोर्वे पंचायत समिती गणात समाविष्ट केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे त्यांना निवडणूक लढण्यास अडचणी निर्माण झाल्या असून, त्यांचे गाव पुन्हा आश्वी बु. प्रारूप प्रभाग गट क्रमांक ९ व आश्वी बु. निर्वाचक गण क्रमांक १७ मध्ये समाविष्ट करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
हरकत अर्जासोबत जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक – २०२५ ची प्रारूप प्रभाग रचना व निर्वाचक गण रचना प्रसिद्धी यादी, नव्याने तयार केलेली प्रारूप प्रभाग रचना व निर्वाचक गण रचना यादी आणि नकाशा प्रत त्यांनी हरकत अर्जासह सोबत दिली आहे.



