
अहिल्यानगर, दि. २५ जुलै:
शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कडक पाऊल उचलले आहे. त्यांनी शालेय बस आणि इतर विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा शालेय बस सुरक्षा समितीच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. या महत्त्वाच्या बैठकीला महानगरपालिकेचे उपायुक्त विजय मुंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे आणि चंद्रकांत खेमनर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक घार्गे यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक शालेय बस किंवा विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असणे अनिवार्य आहे. तसेच, ६ वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी बस किंवा वाहनांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या सोयीसाठी, शालेय बस आणि वाहनांवर अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांक स्पष्टपणे लिहिलेले असावेत, असेही त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अवैध वाहतुकीवर अंकुश घालणे महत्त्वाचे असून, संबंधित विभागांनी संयुक्त मोहीम राबवून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तातडीने कारवाई करावी, असे निर्देशही घार्गे यांनी दिले. विद्यार्थ्यांचा चढ-उतार केवळ शाळेच्या पार्किंगमध्येच सुरक्षितपणे होईल याची खात्री करावी, रस्त्यावर धोकादायक पद्धतीने चढ-उतार करणे पूर्णपणे टाळावे असेही सांगण्यात आले.
प्रत्येक शाळेच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करावी, यावर त्यांनी भर दिला. याशिवाय, सर्व शाळांनी परिवहन समितीच्या बैठका नियमितपणे घेण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. पोलीस अधीक्षक घार्गे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले असून, या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.



पोलीस अधीक्षक कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा शालेय बस सुरक्षा समितीच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अवैध वाहतुकीवर अंकुश घालणे महत्त्वाचे असून,
