

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त
संगमनेर, प्रतिनिधी:
भोजापूर चारीचे पाणी वडझरी गावातील बंधारे भरण्यासाठी न सोडल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी येत्या ३ ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षासह ग्रामस्थांनी यासंदर्भात पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले असून, ग्रामपंचायतीनेही याबाबत ठराव केला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, वडझरी गावातील शेतकरी गेल्या ४० वर्षांपासून निळवंडे व भोजापूरच्या पाण्यापासून वंचित आहेत. भोजापूर चारीचे पाणी नियमानुसार टेलपासून म्हणजे वडझरी गावातील बंधारे भरण्यासाठी अपेक्षित असताना, जलसंपदा विभागाची यंत्रणा काही विशिष्ट लोकांच्या दबावाखाली चुकीचे काम करत आहे. हे पाणी आडमार्गे इतरत्र वळवले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

वडझरी ते गोगलगावपर्यंत जुन्या काळात चारी तयार झालेली असून, ती जलसंपदा खात्याकडेच वर्ग आहे. तिगाव माथ्यापासून वडझरीपर्यंत चारी उपलब्ध असून, थोडी डागडुजी केल्यास हक्काचे पाणी बंधाऱ्यांमध्ये येईल. मात्र, वडझरीला जाणूनबुजून वगळण्यासाठी काही राजकारणी प्रयत्न करत असून, अधिकाऱ्यांनाही चुकीचे काम करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रकरणात मोठे राजकारण होत असून, ज्यांचा खऱ्या अर्थाने पाण्यासाठी सातत्याने संघर्ष आहे, अशा गावांना जाणूनबुजून वंचित ठेवले जात आहे. ज्यांचा चारीच्या पाण्याशी संबंध नाही, असे लोक श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही निवेदनात केला आहे.
ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात, “आमचे राजकारण फक्त पाण्यासाठी आहे, आम्हाला इतर कुठलीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही,” असे स्पष्ट केले आहे. जलसंपदा खाते आपल्याकडे असल्याने, पालकमंत्र्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून वडझरी बंधाऱ्यात पाणी सोडून जलपूजन करावे आणि संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा, ३ ऑगस्ट रोजी वडझरीमध्ये तळेगाव-लोणी रस्त्यावर बायका-मुलांसह जनावरे व अवजारे घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


