

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी:
भोजापूर चारीद्वारे दुष्काळी भागाला पाणी मिळाल्यानंतर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल आणि पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सातत्यपूर्ण काम आणि निसर्गाच्या मदतीमुळे पाणी आले. यात तुमचं योगदान काय? तुम्ही आठ महिन्यात चारी केली का? असा परखड सवाल थोरात यांनी विखे पाटलांना विचारला आहे.
थोरात यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले आहे की, निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केले. तसेच, कालव्यांच्या वरच्या बाजूला पाणी पोहोचावे यासाठीही आपला कायम प्रयत्न राहिला आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून, स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर कारखान्याच्या मदतीने भोजापूर चारी तयार करण्यात आली.
यावर्षी मे महिन्यात चांगला पाऊस झाल्यामुळे निसर्गाची कृपा झाली. तयार असलेली चारी आणि पावसाची साथ यामुळे लवकर पाणी आले, याचा आनंद आहे. मात्र, या चारीच्या कामात विखे पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे काय योगदान आहे, असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला आहे.
भोजापूर चारीचा इतिहास आणि थोरात कुटुंबियांचे योगदान
थोरात यांनी चारीच्या इतिहासाचा संदर्भ देत सांगितले की, निमोण आणि नान्नज दुमाला या दुष्काळी परिसरासाठी १९७७ मध्ये संगमनेर आणि प्रवरा कारखान्यांनी संयुक्त खर्च करून चारी तयार करण्याचे ठरवले होते. पण प्रवरा कारखान्याने त्यावेळी माघार घेतली. त्यानंतर १९९४ मध्ये स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या पुढाकाराने आणि कारखान्याच्या मदतीने ही पूर चारी पुन्हा तयार करण्यात आली. १९९६ मध्ये वटमाई डोंगराजवळ पाणी आले.
हे पाणी पुढे तिगाव माथापर्यंत पोहोचावे यासाठी भाऊसाहेब थोरात यांनी कारखान्याच्या माध्यमातून प्रयत्न केले. २००६ मध्ये कारखान्यातील कामगारांनी श्रमदान करून तिगाव माथापर्यंत चारी पूर्ण केली आणि २ ऑक्टोबर २००६ रोजी येथे जलपूजनही करण्यात आले.
थोरात यांनी पुढे सांगितले की, २००८ मध्ये जलसंधारण मंत्री असताना त्यांनी या चारीच्या दुरुस्ती, सेतु पूल आणि कॉंक्रिट कामांसाठी ५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. भोजापुरचे पाणी दरवर्षी निमोण, पिंपळे, नान्नज दुमाला, पारेगाव बुद्रुक, तळेगाव, तिगाव, वरझडी या गावांसाठी मिळावे याकरिता पाठपुरावा करत ही चारी जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर २०२१ मध्ये पुन्हा चारीच्या दुरुस्तीसाठी २ कोटी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
‘तुम्ही एक तरी खडा उचलला का?’
थोरात यांनी विखे पाटलांना थेट प्रश्न विचारला, “तुम्हीही अनेक वर्षे मंत्री आहात. यापूर्वी या चारीच्या कामासाठी कोणते योगदान दिले? या कामांमध्ये आपण एक तरी खडा कधी उचलला का?” तसेच, नवीन लोकप्रतिनिधींना तर ही चारीसुद्धा माहीत नव्हती, अशी टीकाही त्यांनी केली.
थोरात यांनी जनतेला आवाहन केले की, “काम कोणी केले आणि कोणाचे योगदान आहे हे जनतेला माहीत आहे. खोट्या भूलथापा आणि सोशल मीडियाचा गैरवापर करून भ्रम निर्माण केला जात आहे.”
यावर्षी मे आणि जून महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे भोजापूर धरण लवकर ओव्हरफ्लो झाले आणि त्यामुळे चारीतून लवकर पाणी आले. मात्र, ही चारी गेल्या आठ महिन्यात तयार झाली का, असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला आहे.
थोरातांचा इशारा: ‘लवकरच उत्तर देऊ’
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी इशारा दिला आहे की, “तुम्ही कितीही भूलथापा द्या, सर्वांना लवकरच उत्तर देऊ. दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी आम्ही निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण केले आहेत. पाणी सर्वांना मिळाले पाहिजे यासाठी आमचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच राहतील.”



यावर्षी मे महिन्यात चांगला पाऊस झाल्यामुळे
‘तुम्ही एक तरी खडा उचलला का?’