

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
मुंबई, प्रवीण पुरो:
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर, म्हणजेच ऑक्टोबरच्या शेवटी सुरू होतील, अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. नाशिक विभागातील आगामी निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
- सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर, त्यानुसार महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका या सर्व निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याचा कार्यक्रम आखला जात आहे. नाशिक विभागात एकूण ५० लाख ४५ हजार मतदार आहेत, ज्यासाठी ४,९८२ मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीसाठी ८,७०५ कंट्रोल युनिट्स आणि १७,००० पेक्षा जास्त मतदान यंत्रांची गरज लागेल. सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्यास मनुष्यबळाची मोठी कमतरता भासेल, त्यामुळे टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले. मात्र, प्रथम कोणत्या संस्थेची निवडणूक घेतली जाईल हे अद्याप निश्चित झालेले नाही.
- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबद्दल बोलताना वाघमारे म्हणाले, अनुसूचित जाती आणि जमातींचे आरक्षण निश्चित आहे, तर ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लॉटरी पद्धत वापरली जाईल. यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही ओबीसी आरक्षण होते आणि तेच तत्त्व यावेळीही पाळले जाईल. १ जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार यादीच्या आधारे ही निवडणूक घेण्यात येणार आहे. प्रारूप प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
- व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर होणार नाही – ईव्हीएमबद्दल अनेक तक्रारी असल्या तरी या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट (VVPAT) यंत्रांचा वापर केला जाणार नाही, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले. या बैठकीत निवडणुकीसाठी लागणारे अधिकारी, कर्मचारी आणि तांत्रिक यंत्रणा यांचाही आढावा घेण्यात आला. दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी त्यांनी पुन्हा एकदा पुष्टी दिली. मात्र प्रत्यक्षात निवडणुका या वर्षी होतात की पुढील वर्षी याबाबत मात्र स्पष्टता नाही.





