

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी:
काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. पुढील काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपलाच विजय होणार आहे त्यामुळे, गोंधळलेल्या अवस्थेत न राहता रोखठोक भूमिका घ्यावी ऐनवेळी भूमिका बदलू नये, पराभवानंतरही अधिक जोमाने काम करण्याची गरज असल्याचं सांगत जनतेच्या प्रश्नांवर कठोर आणि ठाम भूमिका घेऊन पुढील काळात अधिक ताकदीने काम करण्याचे आवाहन माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना पराभवाने खचून न जाण्याचा सल्ला देतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी झालेल्या एका बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
या बैठकीला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, शरयू देशमुख, आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, दिलीप पुंड, सोमेश्वर दिवटे, जावेद पठाण, किशोर टोकसे, निखिल पापडेजा यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोरात म्हणाले, येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच पुढील आव्हानांसाठी सज्ज राहावे, निवडणुकीत झालेला पराभव हा आपल्या कामाचा शेवट नाही. हा एक धडा आहे. या धड्यातून आपण शिकून पुढे जायचे आहे. जनतेची सेवा करणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे कुठेही अन्याय होत असेल, तर तो दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.
यावेळी, थोरात यांनी निवडणुकीतील पराभवामागची कारणे आणि भविष्यातील वाटचाल यावर सविस्तर चर्चा केली. त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून आपण या मतदारसंघात काम करत आहोत. जनतेने आपल्याला नेहमीच प्रेम दिले आहे. त्यामुळे या पराभवाचे आत्मपरीक्षण करून आपल्याला पुढे जायचे आहे.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, या पराभवाने आपण निराश होण्याचे कारण नाही. पुढील काळात आपल्याला कठोर भूमिका घेऊन जनतेची सेवा करावी लागेल. आगामी निवडणुकांमध्ये आपला विजय निश्चित आहे. थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.



विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी
थोरात म्हणाले,