

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी: आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. निवडणुका ईव्हीएमवर असोत किंवा बॅलेट पेपरवर, जनता पुन्हा एकदा विरोधकांना घरी बसवेल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
संगमनेर येथील कुंभार गल्लीमध्ये शिवसेना शाखेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार खताळ यांनी कार्यकर्त्यांना सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं. यावेळी शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खताळ म्हणाले, शिवसेना पक्षात कार्यकर्ता हे पद सर्वात महत्त्वाचे आहे. मी या मतदारसंघाचा आमदार असलो तरी, सर्वप्रथम एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी कार्यकर्ता म्हणूनच काम करावे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिकवण दिली. त्याच विचारधारेवर आपण काम करत आहोत. शिवसैनिकांनी केवळ पद घेऊन मिरवू नये, तर गोरगरीब, कष्टकरी आणि वंचितांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
शिवसेना शाखेत मांडले जाणारे प्रश्न तिथे सुटले नाहीत, तर ते माझ्या जनसंपर्क कार्यालयात घेऊन या. तिथे मी ते सोडवेन. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी सामान्य शिवसैनिकांना सन्मान देण्याची जी परंपरा सुरू केली होती, ती पुढे चालू ठेवण्यावरही त्यांनी भर दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेना पुन्हा वाढत आहे. आपल्याला सर्वांना सोबत घेऊन पक्षाचे काम वाढवायचे आहे. कार्यकर्त्यांनी एकमेकांमध्ये समन्वय राखून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेनेचे उपशहर प्रमुख अजित जाधव यांनी केले. कुंभारगल्ली शाखाप्रमुख लाला दायमा यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.





शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के