

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी: हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून दिल्यास या ठिकाणी भविष्यात मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल. खंडोबा देवस्थानात झालेल्या कथित ११ लाख रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. गरज पडल्यास आपण स्वतः मंदिराबाहेर आंदोलन करू, असे प्रतिपादन संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी केले.
घारगाव ते हिवरगाव पावसा या ३३ केव्ही उच्चदाब वीजवाहिनीचा नुकताच शुभारंभ खताळ यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. हिवरगाव पावसा येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुभाष गडाख होते. यावेळी भाजपचे उपाध्यक्ष अशोक कानवडे, माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, उपसरपंच सुजाता दवंगे, शिवसेना अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोमनाथ भालेराव, केशव दवंगे, बाळासाहेब शेटे यांच्यासह अनेक मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ यांनी सांगितले की, या नवीन वीजवाहिनीमुळे हिवरगाव पावसा, सावरगाव, रायतावाडी, झोळे, देवगाव, शिरापूर, निमगाव, टेंभी, पिंपळगाव माथा, खांडगाव या गावांना पूर्ण दाबाने वीज मिळेल. तसेच, पद्मनगर भागातील वीज उपकेंद्रावरील भार कमी होण्यासही मदत होईल. या भागातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल, याव्यतिरिक्त, त्यांनी विकासकामांच्या नावाखाली झालेला भ्रष्टाचार उघड करण्याचाही निर्धार व्यक्त केला.
प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिवरगाव पावसा येथील खंडोबा देवस्थानसाठी आतापर्यंत मोठा निधी दिला असल्याचे आमदार खताळ यांनी नमूद केले. हे मंदिर ‘क’ दर्जातून ‘ब’ दर्जा देण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे, तो लवकरच मंजूर होऊन मंदिराच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होईल.
याचबरोबर, त्यांनी तमाशा कलावंत पवळाबाई हिवरगावकर यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश दवंगे यांनी केले, तर आभार सोमनाथ भालेराव यांनी मानले.
अडचणींवर मात करून योजना मार्गी- महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धनंजय खैरनार यांनी सांगितले की, या वीजवाहिनीच्या कामात अनेक अडचणी आल्या. मात्र आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांमुळे त्या दूर झाल्या. या वीजवाहिनीमुळे सावरगाव तळ, पिंपळगाव माता, रायतेवाडी, देवगाव या भागांतील शेतकऱ्यांचा फायदा होईल. काही कामे मार्गी लागली असून, उर्वरित कामे चार-पाच महिन्यांत पूर्ण होऊन उपकेंद्र कार्यान्वित होईल.



आमदार खताळ यांनी सांगितले की,
अडचणींवर मात करून योजना मार्गी-