महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी: राज्याचे माजी महसूलमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तथाकथित महाराजाच्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. आपण तत्वासाठी आणि विचारांसाठी जगणारे असून, नथुराम गोडसेसारख्या व्यक्तीकडून मारले जाण्याची धमकी मिळाली, तर असे बलिदान मी आनंदाने स्वीकारेल, असे विधान थोरात यांनी केले. मी महात्मा गांधी नाही, मात्र विचारांसाठी बलिदान देण्यास तयार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे एका कीर्तनाच्या कार्यक्रमात झालेल्या वादानंतर गेल्या दोन दिवसांपासून संगमनेर राजकीय वादाने धुमसत आहे. संगमनेरमधील शांततेला गालबोट लागण्याची चिन्ह निर्माण झाली असतानाच कीर्तनकार म्हणविणाऱ्या आणि वादाला कारणीभूत ठरलेल्या संदेश भंडारे या महाराजाकडून माजी मंत्री थोरात यांना जीवे मारण्याची धमकी एका व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी थोरात माध्यमांसोबत बोलत होते.
राज्यघटना संतांच्या विचारांतून साकारली!- थोरात यांनी राज्यघटनेची मूलभूत तत्वे आणि वारकरी संप्रदायातील संतांच्या शिकवणुकीमध्ये असलेला संबंध स्पष्ट केला. ते म्हणाले, भारतीय राज्यघटना ही वारकरी संप्रदायाच्या संतांच्या परंपरेतून आलेल्या उदात्त विचारांमधून तयार झाली आहे. त्यामुळे कोणत्याही कीर्तनकाराने राज्यघटनेचा अवमान होईल असे कृत्य करू नये किंवा राजकीय भाष्य करू नये. नथुराम म्हणून घेणाऱ्या या महाराजांना राज्यघटनेवर बोलण्याचा अधिकार नाही, असे सांगत त्यांनी अशा वक्तव्यांचा निषेध केला.
घुलेवाडी येथील घटनेचा संदर्भ देत थोरात यांनी सांगितले की, जेव्हा संबंधित महाराजांनी मूळ विषय सोडून राजकीय विषयांवर बोलायला सुरुवात केली, तेव्हा एका तरुणाने त्यांना अभंगावर बोलण्याची विनंती केली. त्यानंतर महाराजांनी त्या तरुणाला ‘सायको’ म्हटले, यामुळे नाराजी वाढली. या घटनेव्यतिरिक्त कोणताही हल्ला झाला नाही किंवा गाडीची तोडफोड झाली नाही. मात्र या प्रकरणी खोट्या केसेस दाखल केल्या जात असून, कार्यकर्त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राजकारणासाठी वारकरी संप्रदायाचा वापर?- काही तथाकथित महाराज राजकारण करण्यासाठी वारकरी संप्रदायात शिरले आहेत. हे महाराज कोणाच्या तरी हातचे बाहुले बनले असून, संगमनेरसारख्या शांत तालुक्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा तथाकथित महाराजांची कीर्तने थांबवण्यात आली नाहीत, त्यांच्यावर हल्ला झाला नाही किंवा त्यांच्या गाडीची तोडफोड झाली नाही, असे थोरात यांनी स्पष्ट केले. खोट्या केसेस दाखल करून कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात आहे. संगमनेर मधून सुरुवात करून महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याच्या मोठ्या षड्यंत्राचा हा भाग आहे, असेही ते म्हणाले.
खऱ्या वारकऱ्यांचे काम संतांच्या शिकवणुकीचा प्रसार करणे!- थोरात म्हणाले, जो माणूस नथुराम गोडसेचे नाव घेऊन बोलतो, तो वारकरी होऊ शकत नाही. खऱ्या वारकऱ्यांचे म्हणणे आहे की, कीर्तनात राजकारण नसावे, तर संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे. आम्ही स्वतः वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान मानणारे असून, भागवत धर्म आणि मानव धर्म मानतो. आमच्या दृष्टीने आम्ही कोणाचाही द्वेष करत नाही, हेच त्यांना दु:ख आहे, असे सूचक विधानही त्यांनी केले.
प्रशासन दबावाखाली, गृहमंत्र्यांनी लक्ष घालावे- पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप थोरात यांनी केला. पोलिसांनी स्वतंत्रपणे आणि निपक्षपातीपणे काम करायला हवे, मात्र काही लोकांच्या फोनवरील दबावामुळे ते चुकीच्या पद्धतीने वागत आहेत. या प्रकरणात घटनास्थळी नसलेल्या व्यक्तींची नावे देखील आरोपींच्या यादीत आहेत.
स्थानिक आमदारांच्या वक्तव्याचाही घेतला समाचार – सोमवारी झालेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी स्थानिक आमदार अमोल खताळ यांनी थोरात यांचा डीएनए तपासावा लागेल असे विधान केले होते या विधानाचा समाचार घेताना थोरात म्हणाले, खालची पातळी किती असावी याचे हे उदाहरण आहे. त्यांना डीएनए काय असतं माहित आहे का? डीएनए शब्द त्यांना कोणीतरी लिहून दिला असेल आणि ते बोलले असतील. यापेक्षा त्यांची अधिक बौद्धिक पातळी नसल्याचे ते म्हणाले.
थोरात यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन केले की, राज्याची प्रगती करायची असेल, तर अशा प्रवृत्तींवर त्वरित कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करावा. राज्यात निवडणुका जवळ आल्या की अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा अनुभव आपल्याला याआधीही आला आहे आणि आता संगमनेरमधूनच त्याची सुरुवात झाल्याचे दिसत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
तत्व, विचारांसाठी जगत असताना असा नथुराम समोर आला तर बलिदान आनंदाने घेईल… माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे तथाकथित महाराजांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर!
संगमनेर मधून सुरुवात करून महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याच्या मोठ्या षड्यंत्राचा हा भाग आहे, असेही ते म्हणाले.





राज्यघटना संतांच्या विचारांतून साकारली!-
प्रशासन दबावाखाली, गृहमंत्र्यांनी लक्ष घालावे-