अहमदनगर जिल्ह्यात आकर्षणाचे केंद्र; संत ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन सोहळा आणि महादेवाचा देखावा ठरणार मुख्य आकर्षण
संगमनेर –
गेल्या 11 वर्षांपासून खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरु करत, यंदा मालपाणी उद्योग समूहाच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मिरवणूक अधिक भव्य आणि शाही असणार असून त्यात विविध प्रकारच्या 22 पथकांचा समावेश करण्यात आला आहे. ही मिरवणूक मंगळवारी (२ सप्टेंबर) सकाळी साडेदहा वाजता मालपाणी लॉन्स येथून सुरु होणार आहे.
मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी यांनी या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, काही कारणांमुळे गेल्या एक दशकाहून अधिक काळ ही मिरवणूक काढली नव्हती. परंतु यंदा पुन्हा एकदा जुनी परंपरा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मिरवणूक संगमनेरकरांसाठी एक पर्वणी ठरणार असून, त्यात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी आणि महादेवाचा जिवंत देखावा ही प्रमुख आकर्षणे असतील.
सकाळी साडेदहा वाजता कॉलेज रस्त्यावरील मालपाणी लॉन्स येथून मिरवणुकीला सुरुवात होईल. बजाज दुचाकी दालनासमोर मालपाणी परिवाराच्या वतीने गणरायाची पूजा केली जाईल. त्यानंतर ही मिरवणूक महामार्गावरुन बसस्थानक, नवघरगल्ली, गवंडीपुरा मशीद, मेनरोड मार्गे मालपाणी विद्यालयाजवळ समाप्त होईल.
या मिरवणुकीत उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांनी तयार केलेले ढोल-ताशा पथक, पारंपरिक झांजरी, लेझीम आणि विविध लोकनृत्ये सादर केली जातील. तसेच, महाबली हनुमानाच्या भव्य मूर्तीसमोर ‘रामजी की निकली सवारी’ या गाण्यावर नृत्य सादर होणार आहे. शिर्डी वॉटरपार्कचे ॲक्रोबॅट्स आणि साईतीर्थ पार्कची साईपालखी मिरवणुकीची शोभा वाढवतील. यंदाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचा जिवंत देखावा आणि त्याचबरोबर महादेवाचा आकर्षक देखावा असणार आहे. मिरवणुकीच्या शेवटी, सजवलेल्या रथात श्री गणेशाची शाही स्वारी निघेल, ज्याच्या पुढे ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करणारी भजनी मंडळी सहभागी असतील.
सन 1949 पासून मालपाणी उद्योग समूहात गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. तेव्हापासून कामगार आणि कर्मचारी मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करतात. सुरुवातीला गणेश स्थापनेच्या दिवशी मिरवणूक निघायची, मात्र नंतर सातव्या दिवशी विसर्जन मिरवणूक काढण्याची प्रथा सुरू झाली. गेली 76 वर्षे ही परंपरा अखंडित असली, तरी 11 वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीला खंड पडला होता. यंदा पुन्हा एकदा ती परंपरा सुरु झाल्याने संगमनेरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे.
मालपाणी उद्योग समूहाने शहरातील नागरिकांना या शाही सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.



संगमनेर – 
या मिरवणुकीत उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांनी
