संगमनेर – अनंत पांगारकर
यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. शहराच्या राजकारणात मोठे फेरबदल झाले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून अमोल खताळ आमदार झाले आहेत. खताळ यांच्या विजयाने संगमनेरमध्ये शिवसेनेला पहिल्यांदाच आमदारकी मिळाली आहे. तरुण मतदारांचा मोठा पाठिंबा असलेल्या खताळ यांच्याकडे आता राजकीय सत्ताकेंद्र आल्यामुळे या वर्षीच्या गणेशोत्सवाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.
मानाच्या मंडळांची मिरवणुकीतून माघार- यंदाच्या मिरवणुकीत आणखी एक लक्षणीय बदल दिसतोय. नेहरू चौक मित्र मंडळ आणि तानाजी युवक मित्र मंडळ यांसारख्या पाच प्रमुख मानाच्या गणेश मंडळांनी मुख्य मिरवणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. नवघर गल्ली मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाचा मिरवणुकीतील सहभाग अद्याप जर-तरच्या स्थितीत आहे. दिवसेंदिवस मिरवणुकीतील मंडळांची संख्या कमी होत चालली आहे. यामुळे मिरवणुकीची पारंपरिक शान काही प्रमाणात कमी झाली आहे.
मात्र, सोमेश्वर रंगारगल्ली तरुण मित्र मंडळ, चौंडेश्वरी मित्र मंडळ, साळीवाडा तरुण मित्र मंडळ, राजस्थान तरुण मित्र मंडळ, चंद्रशेखर चौक मित्र मंडळ, माळीवाडा मित्र मंडळ, भगतसिंग मित्र मंडळ, स्वामी विवेकानंद मित्र मंडळ यांसारखी जुनी आणि मानाची मंडळे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत मानाच्या गणपतींमध्ये नसलेली आणखी सहा मंडळेही मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मिरवणुकीत सामील होण्यास इच्छुक असलेले अनेक मंडळे गेल्या काही वर्षांपासून स्वतंत्र मिरवणुका काढत असुन मुख्य मिरवणुकीत सहभागी होताना दिसत नाही.
रेंगाळणारी मिरवणूक आणि नागरिकांचा घटलेला उत्साह- गेल्या काही वर्षांपासून विसर्जन मिरवणूक रेंगाळण्याची समस्या कायम आहे. अनेक मंडळांना रात्री उशिरापर्यंत वाट पाहावी लागते, यामुळे त्यांना रात्री १२ नंतर वाद्य वाजवण्याची परवानगी मिळत नाही आणि त्यांना ‘मूक मिरवणूक’ काढावी लागते. डीजेचा कानठळ्या बसवणारा आवाज, मिरवणुकीतील कमी झालेले देखाव्यांचे प्रमाण आणि मिरवणुकीचा वाढलेला कालावधी यामुळे संगमनेरकरांचा मिरवणुकीतील सहभाग कमी झाल्याचे दिसत आहे.
नव्या अधिकाऱ्यांसमोरची कसोटी – गेल्या वर्षभरात संगमनेरमध्ये प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक यांसारखे अनेक महत्त्वाचे अधिकारी बदलले आहेत. त्यांना संगमनेरच्या विसर्जन मिरवणुकीचा अनुभव नाही. केवळ तहसीलदार धीरज मांजरे, मुख्याधिकारी रामदास कोकरे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनाच यापूर्वीच्या मिरवणुकीचा अनुभव आहे. त्यामुळे या वर्षी ही मिरवणूक शांततेत आणि यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर आहे.
मिरवणुकीच्या मुख्यमार्गावर पोलीस प्रशासनाने कानठळ्या बसविणाऱ्या डीजेवर बंदी आणले असले तरी ही बंदी मिरवणुकीत प्रत्यक्षात कितपत अमलात येईल याबाबत मात्र साशंकता आहे. वेळेत मिरवणूक संपविण्याचे आव्हानात्मक काम प्रशासनाला पार पाडावे लागणार आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाला मोठा संयम दाखवावा लागणार आहे.
संगमनेरच्या चाळीस वर्षाच्या एक हाती सत्तेला सुरुंग लावल्याने तरुणांमध्ये उत्साह आहे. असे असले तरी काही दिवसांपूर्वी संगमनेर फेस्टिवलमध्ये आमदार खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. या सर्व बदलत्या घडामोडींमुळे, प्रशासनावर राजकीय दबाव झुगारून संगमनेरची शांतता राखण्याची मोठी जबाबदारी आली आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी अरुण उंडे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आणि मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांच्या नेतृत्वाखालील टीमसाठी ही मिरवणूक एक मोठी परीक्षा असणार आहे.
संगमनेरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाच्या मंडळांचा कमी होणारा सहभाग, बदलती राजकीय समीकरणे आणि नव्या अधिकाऱ्यांमुळे प्रशासनासमोर आव्हान
गेल्या काही वर्षांपासून संगमनेरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीची शान कमी होत असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे राजकीय समीकरणं बदलली आहेत, तर दुसरीकडे डीजेचा कर्कश आवाज आणि मिरवणुकीचा वाढता कालावधी यामुळे नागरिकांचा उत्साह मावळत चालला आहे. या वर्षी प्रशासनातील अनेक महत्त्वाचे अधिकारी नवीन असल्याने, ही विसर्जन मिरवणूक त्यांच्यासाठी एक मोठी कसोटी ठरणार आहे.





रेंगाळणारी मिरवणूक आणि नागरिकांचा घटलेला उत्साह-
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी अरुण उंडे,