प्रवीण पुरो –
महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला गलाबोट लावणार्या विकृत जमातीने भाजपची चांगलीच उतरवली आहे. राज्याचा सर्वांगीण चांगुलपणा खड्ड्यात काम त्या पक्षात अविरत सुरू आहे. पक्षातलं आपलं स्थान टिकवण्यासाठी विराधकांवर चिखलफेक करतो, अशी स्पर्धा सुरू आहे. सत्तेच्या लालसेपोटी भारतीय जनता पक्षात सामील झालेल्यांची अवस्था काय करू आणि काय नको, अशी झाली आहे. राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘व्होटचोर’ मोहिमेने या सार्यांचं धाबं दणाणलं आहे. यामुळे संधी घेत विरोधकांना चेपण्याचा, त्यांना बदनाम करण्याचा पध्दतशीर प्रयत्न होतो आहे. भाजपवर संकट आलं की हे चवताळखोर कामाला लागतात. प्रवक्ते तर चेकाळले आहेतच. पण प्रवक्ते नसलेल्यांची अवस्थाही विचित्र झाली आहे. आपल्या पक्षात ज्यांना काडीची किंमत नाही, अशी माणसं नेत्यांचं आपल्याकडे लक्ष रहावं यासाठी कुठल्याही थराला जातात. हे एक नव्हे अनेकदा घडूनही त्यांना आणि पक्ष नेत्यांना त्याचं काही वाटत नाही. वाचाळ पध्दतीने विरोधकांवर टीका करणं इतकंच त्यांचं काम.
ही टीका इतक्या खालच्या पातळीची असते की ती कोणी ऐकूही नये. टीव्हीच्या वाहिनीवर प्रेम शुक्ला नावाच्या पक्ष प्रवक्त्याने वापरलेल्या भाषेच्या दर्शनाने भाजपचं खरं रूप बाहेर आलं. या मुर्खाने एका चर्चेवेळी काँग्रेस प्रवक्त्याच्या मातेला वेश्यालयात नेऊन उभं केलं होतं. या प्रवक्त्याचा समाज माध्यमांवर लोकांनी घेतलेला समाचार पाहून प्रवक्ते पदावरून त्याची हकालपट्टी होईल, असं वाटत होतं. दुर्देवाने तसं काही झालं नाही. असे अनेकजण भाजपच्या संस्कृतीची वासलात लावत आहेत. त्यांना जणू अशाच कामासाठी नेमलं आहे की काय असं वाटल्याहून राहत नाही.
एका कंत्राटदाराच्या बिलावर सही करावी, यासाठी जत पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंता असलेल्या अवधुत वराड यांचा मानसिक छळ केल्याने वराड यांनी आत्महत्या केली. या प्रकरणात जयंत पाटील यांनी संबंधितांकडे चौकशी केल्याचा राग घेऊन पडळकर नावाच्या आमदाराने जयंत पाटील यांच्यावर अत्यंत हिन दर्जाची टीका केली. सांगलीत एका जाहीर कार्यक्रमात बोलताना पडळकरने जयंत पाटील हा बिनडोक माणूस असल्याचं वक्तव्यं केलं. इतकंच नव्हे तर जयंत पाटील हे राजाराम पाटील यांची अवलाद नाही, काहीतरी गडबड आहे, ती कोणाची आहे हे तपासलं पाहिजे. पुन्हा त्याने जयंत पाटील ही भिकार्याची अवलाद असल्याचं म्हटलं. या माणसात किती विकृती असावी, याचं हे उदाहरण होय.
अवधुत वराड याचा पडळकर आणि त्याच्या स्वीय सहाय्यकाने घातपात केल्याचा आरोप वराड यांच्या कुटुंबियांनी केला आहे. जत पोलीस ठाण्यात अवधुत यांच्या नातलगांनी तक्रार केली. तरीही पडळकर याच्यावर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. गुन्हे दाखल न झाल्यास पोलीस ठाण्याच्या समोर आत्मदहन करण्याचा इशारा वराड यांच्या नातेवाईकांनी दिला आहे. इतकं झाल्यावर विरोधकांनी गप्प बसावं, असं पडळकरला वाटत असावं.
राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून शुचिर्भूत समजणार्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे घडत आहे. घडवणार्यांना कोणताही जाब विचारला जात नाही की साधी विचारणाही होत नाही. यातूनच नितेश राणे, नवनित राणा, गुणरत्न सदावर्ते, मोहित कंभोज, गिरीष महाजन, परिणय फुके, प्रसाद लाड, चित्रा वाघ, अमित साटम या नेत्यांकरवी भाजपने नव्या संस्कृतीला जन्म दिला, असं म्हणता येईल.
नेत्यांनी दम भरला असता तर या लोकांची वाचाळगिरी थांबली असती. ते होत नसल्याने नेतेच या लोकांना बोलायला भाग पडत आहेत, असा अर्थ निघतो. यात गोपीचंद पडळकर याचं नाव आवर्जून घेतलं जातं. जिभेला हाड नसणं म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण म्हणजे पडळकर म्हणता येईल. जयंत पाटलांना हासडलेल्या शिव्यांआधी त्यांनी शरद पवारांचा इतिहास महाराष्ट्राला सांगितला. पवार हे महाराष्ट्रासाठी कोरोना व्हायरस आहेत, असा पडळकर म्हणाला. राज्यभर पडळकर याचे पुतळे जाळण्यात आले, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तरीही अक्कल आली नाही. आश्चर्य म्हणजे प्रवीण दरेकर यांनी पडळकरची भूमिका समजून घेतली पाहिजे, असं म्हणत त्याचं समर्थन केलं होतं.
नेतेच या मुर्खाला पाठीशी घालायला लागल्यावर काय होणार? मारकडवाडीतील नागरिकांनी तिथल्या निवडणुकीत झालेल्या गैरप्रकाराबद्दल जाब विचारताच पडळकर चवताळला. त्याने पवारांना कटकारस्थानाचा कारखाना संबोधलं. राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करताच पडळकरने पवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याच पडळकरने पवारांना उद्देशून ते अधुनिक नारदमुनी असल्याचं म्हटलं होतं. तेव्हाही राज्यात पडळकर याचा निषेध झाला, पुतळे जाळले.
एका पत्रकार परिषदेत त्याने पवारांनी 50 वर्षं सोनं म्हणून पितळ विकलं, असा आरोप केला. इतकं करून तो थांबला नाही. रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात, असं वक्तव्यं करत त्याने पातळी सोडली. पक्षाची लाज घालवणार्या या माणसाला तरीही जाब विचारला गेला नाही. यामुळे तो सुटतच राहिला. शरद पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहर्याला कँसर झाल्याचं वक्तव्य त्याने केलं.
या माणसाने भाजपत प्रवेश घेतला त्या कार्यक्रमात त्याची फडणवीस यांनी इतकी भलामण केली की त्याला स्वत:चा तोल राहिला नाही. पुढे तर तो भाजपचा बारामतीतील उमेदवार असेल, असं घोषित करून फडणवीस यांनी त्याला हरभर्याच्या झाडावर चढवलं. हाच माणूस प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीत असताना त्याने धनगरांना भाजप आरक्षण देत नाही, असा आरोप करत भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. सांगली लोकसभा निवडणुकीची उमेदवारी त्याला वंचितने दिली. तिथे पराभूत झाला आणि तो राष्ट्रीय समाज पक्षात सामील झाला.
बाळासाहेब थोरातांना मारण्याची धमकी देणार्या संग्राम भंडारे नावाच्या किर्तनकाराचं पडळकरने उघड समर्थन केलं होतं. आम्हाला नथुराम व्हावं लागेल, असं म्हणत भंडारेने किर्तनातून थोरातांना ही धमकी दिली होती. विधानभवनाच्या पायर्यांवर पडळकरच्या मोक्कामधील आरोपीने नितीन देशमुख यांना केलेली मारहाण सार्या महाराष्ट्राने पाहिली. कधी नव्हे ती महाराष्ट्र विधानमंडळाची लाज रस्त्यावर आली. बिहार, उत्तरप्रदेश परवडले पण महाराष्ट्र नको, असं म्हटलं जाऊ लागलं. विधानसभा अध्यक्षांनी तंबी दिल्यावर गोपींचंदने सभागृहाची जाहीर माफी मागितली.
या घटनेला दोन महिनेही उजाडले नसतील तोच वाचाळ पडळकरने धार्मिक तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला. एका सार्वजनिक कार्यक्रमात पडळकरने खिश्चन समुदायाला डिवचलं. ख्रिस्त धर्माचं धर्मांतर करून हिंदू धर्म स्वीकारण्यासाठी त्याने 11 लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा या कार्यक्रमात केली. समुदायाने याला आक्षेप घेतला आणि धार्मिक वितंडवाद करणार्या पडळकरच्या विरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याचा निषेध म्हणून ख्रिस्ती बांधवांनी आझाद मैदानात मोर्चा काढला. यावेळी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. मात्र कारवाई शुन्य. राहुल पाटील नावाच्या अभियंत्याच्या आत्महत्येला जबाबदार धरून राहुलच्या नातलगांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. काहीही कारवाई नाही. औंध देवस्थानाच्या 34 एकर जमीन लाटल्याचं प्रकरण तर गुलदस्त्यातच आहे. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी हा आरोप करताना त्याचे पुरावेही दिले. मात्र कारवाईचा पत्ता नाही. असंच होणार असेल तर अशा माणसाला आता समाजाने जाब विचारण्याची गरज निर्माण झाली आहे.
रविवार विशेष लेख ___ भाजपतील विकृत जमात
लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार आहेत.

