
विशेष प्रतिनिधी / मुंबई
विविध कारणांसाठी आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्ष कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनाना जेरीस आणणाऱ्या राज्य सरकारने आता काळे झेंडे दाखवणारे आणि रस्ते अडवणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधी पोलीस कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
अमरावतीमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्याने आणि मराठवाड्यात पूर पाहणीसाठी आलेले आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचीही गाडी आडवण्याचा प्रयत्न झाल्याने महसूल मंत्री बावनकुळे आक्रमक झाले आहेत. त्यांनी मंत्र्यांची गाडी अडवणारे आणि काळे झेंडे दाखवणाऱ्यांवर पोलीस कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.


मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेती, पिके आणि गुराढोरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना योग्य मदत, कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी होत आहे. दरम्यान मंत्री आणि भाजप नेते हे दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करत असताना त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस पक्षाची ही कृती बरोबर नाही. आमच्या अध्यक्षाची गाडी अडवणे, सोयाबीन फेकणे योग्य नाही. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला निवेदन घ्यायला बोलावलं तर मी आलो असतो. गाडी अडवणं काळे झेंडे दाखवणं बरोबर नाही. काँग्रेस कार्यकर्ते जर अशा पद्धतीने वागणार असतील तर मग आम्हाला त्याच पद्धतीची कृती करावी लागेल. जशास तसे करावे लागेल, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना एक प्रकारे इशारा दिला आहे.

मंत्री बावनकुळे म्हणाले, चव्हाणांच्या गाडीवर सोयाबिन फेकण्यात आलं, याबद्दल पोलीस आयुक्तांना सांगणार आहे. ज्यांनी गाडी अडवली त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. सरकारशी काम आहे तर मला निवेदन द्यायला पाहिजे. पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी का थांबवलं नाही, असा पोलिसांनाही जाब पालकमंत्री बावनकुळे यांनी विचारला. यानंतर असं झालं तर ते सहन केलं जाणार नाही, असा इशाराही त्यांनी पोलिस खात्याला दिला आहे.

