पाथर्डी (अहिल्यानगर): अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या भीषण नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर, थोरात यांनी शनिवारी (२७ सप्टेंबर) पाथर्डी येथील श्री मोहटादेवीच्या चरणी प्रार्थना करत, या पाषाण हृदयी सरकारला काही केल्या पान्हा फुटत नाहीये, यांना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सद्बुद्धी दे, अशी आर्त विनवणी केली.
बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाहणीला सुरुवात करून त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी तालुक्यांतील नुकसानग्रस्त गावांमध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. सध्या नवरात्रोत्सव सुरू असताना महाराष्ट्रातील जवळपास ३० जिल्ह्यांमधील शेतकरी अतिवृष्टीने बाधित झाला आहे.
शेतकऱ्यांचे प्रपंच उध्वस्त झाले आहेत. जमिनी वाहून गेल्या आहेत. गुराढोरांचे मोठे नुकसान झाले आहे, आणि काही शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशा गंभीर संकटातही सरकारची संवेदना जागृत होत नसल्याची खंत थोरात यांनी व्यक्त केली.
माजी महसूलमंत्री थोरात यांनी माध्यमांशी बोलताना सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, या पाषाण हृदयी सरकारला काही केल्या पान्हा फुटत नाही. शेतकऱ्यांचे प्रपंच उध्वस्त झाले आहेत, तरीही त्यांची वेदना सरकारपर्यंत पोहोचत नाही. केवळ आकडेवारीचा खेळ करून शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसता येणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी सरकारी अनास्थेवर बोट ठेवले. मंत्री येतात आणि जातात, पण बोलत नाहीत किंवा उत्तरे देत नाहीत. त्यांच्यात आत्मविश्वास नाही. अशा संकटात सरकार कोठे आहेत, असा प्रश्न पडत असल्याचे त्यांनी म्हटले.
सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या मोहटादेवीच्या चरणी थोरात यांनी हात जोडून प्रार्थना केली. मी सकाळपासून छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर येथील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या व्यथा अनुभवल्या. त्यामुळे मी मोहटादेवीला प्रार्थना करतोय की, या संकटातून शेतकऱ्यांना वाचव आणि केंद्र व राज्य सरकारला सद्बुद्धी दे, असे ते म्हणाले.
या पाहणी दौऱ्यात थोरात यांच्यासोबत आमदार हेमंत ओगले, सचिन गुजर, करण ससाने, अभिजीत लुनिया, तालुकाध्यक्ष नासिर शेख यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवीच्या चरणी ‘सद्बुद्धी’साठी साकडे: या पाषाण हृदयी सरकारला पान्हा फुटावा
शेतकऱ्यांचे प्रपंच उध्वस्त झाले आहेत, तरीही त्यांची वेदना सरकारपर्यंत पोहोचत नाही. केवळ आकडेवारीचा खेळ करून शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसता येणार नाहीत



पाथर्डी (अहिल्यानगर): अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या भीषण नुकसानीच्या पार्श्वभूमीवर
शेतकऱ्यांचे प्रपंच उध्वस्त झाले आहेत.
सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या मोहटादेवीच्या चरणी