देशातील बिघडत्या सामाजिक वातावरणाने आता अतिरेक गाठला आहे. धार्मिक आणि सामाजिक सलोखा बिघडवणार्यांवर सरकारचा कोणताही अंकुश राहिलेला नाही. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश, प्रा. एम. एम. कलबुर्गी यांचा बळी घेणार्या शक्तीने टोकाचं पाऊल गाठत आता थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना टार्गेट केलं आहे. खंडपीठापुढे सुनावणी सुरू असताना 75 वर्षाच्या राकेश तिवारीने त्यांच्यावर पायातला बुट फेकला. ही घटना एकट्या गवईंपुरती मर्यादित राहिलेली नाही. ज्यांनी देशातील जनतेला न्याय द्यावा, अशा यंत्रणेच्या प्रमुखावरच बुट फेकला जात असेल तर सामान्यांचं या देशातील स्थान काय? असा साधा प्रश्न आहे. गवईंनी या व्यक्तीला माफ केलं आणि आपलं काम पुढे सुरूच ठेवलं, पण काळ सोकावला त्याचं काय? ज्याने हे कृत्य केलं त्या राकेश किशोर तिवारी याची ज्या प्रकारे भलामण केली जातेय, त्याच्या सनातनी कृत्याला ज्या प्रकारे उत्तेजन दिलं जातंय ते पाहाता देश अत्यंत घातक वळणावर पोहोचलाय, हेच खरंय. आजवर सत्तेवरील सरकारची पाठराखण करण्यापुरतं मर्यादित असलेलं वातावरण आता अतिरेकी कृत्याचं समर्थन करू लागतं, तेव्हा देशाचं काही खरं नाही, असंच म्हणता येईल.
अनस्तंगीर नावाच्या वकिलाने तर हा इतरांवरचा हल्ला नव्हता, असं विकृत वक्तव्यं करून तिवारीच्या कृत्याला खतपाणी घातलं. तिवारीने केलेल्या कृत्याचा त्याला जराही पश्चाताप होत नाही, कारण त्याला हे देवानेच करायला सांगितलं, असं तो म्हणतो. वरील मान्यवरांची हत्या करणार्यांच्या तोंडचं वाक्यही हेच आहे. आपण केलेल्या नीच कृत्याचा त्यांनाही पश्चाताप झाला नव्हता, हे लक्षात घेण्यासारखं आहे. त्यांनाही हे कृत्य करायला इश्वरानेच सांगितलं होतं, अशी बाजू ते मांडत आले आहेत. चेहर्यावर अगदी सामान्य वाटणारी माणसं किती टोकाचं कृत्य करू शकतात, हे तिवारी, विरेंद्र तावडे, सचिन एंडरे, समीर गायकवाड यांच्या कृत्याने स्पष्ट झालंय. यापैकी एकाही आरोपीच्या मुस्कटात मारलं तर त्यातला प्रत्येकजण दुसरा गाल पुढे करण्याच्या पात्रतेचा आहे.
दुर्देव हे की ज्यांनी ज्यांनी ही कृत्य केलीत त्या सगळ्यांचे पाठीराखे सारे भाजपचे भक्त आहेत. इतकंच काय पण तिवारीने केलेल्या कांडानंतर त्याला घरी पोहोचवणाराही भाजपचा प्रवक्ताच होता. यावरून सत्ताधार्यांचं या मागचं धोरण कळायला वेळ लागत नाही.
तिवारी नावाचा हा माणूस इतका विकृत आहे की तो ज्या ठिकाणी राहतो तिथल्या नागरिकांनाही त्याने जगणं अशक्य करून सोडलं आहे. इतक्याशा कारणांसाठी तो सोसायटीतल्या लोकांनाही छळत असतो. वकील म्हणून तो इतका विकृत असावा हे ही कोणी जाणू शकत नाही. तिवारीच्या नीच कृत्यानंतर भाजपच्या आयटी सेलने सुरू केलेला गवईंच्या ट्रोलिंगचा खेळ पाहिला की सामान्यांचं डोकच फिरेल. या ट्रोल गँगमधल्या एकाने तर ‘एकही असा हिंदू वकील नाही, की जो सरन्यायाधिशांचं डोकं धरून भिंतीवर आपटून त्याचे दोन तुकडे करेल…’ इतक्या टोकाची भाषा वापरली आहे. नवा गोडसे निर्माण करण्याची हिंमत दाखवणार्या ट्रोल गँगमधील एकालाही कायद्याचा धाक राहिलेला नाही. टोकाची विखारी भाषा वापरूनही त्यांच्या विरोधात काहीही कारवाई न होणं हे लक्षण देशातील वातावरणाची जाणीव करून देणारं आहे.
खजुराओतील विष्णूच्या तुटलेल्या मूर्तीबाबतच्या सुनावणीला बेदखल करताना त्यासाठी ध्यान धरा, परमेश्वरच याला ठीक करेल, ते सुरक्षित क्षेत्र आहे, न्यायालय काहीही करू शकत नाही, या सरन्यायधिशांच्या वक्तव्याचा इतका संताप ज्या तिवारीला आला त्याला याच धार्मिक कृत्यांवर व्यक्त झालेल्या या आधीच्या असंख्य वक्तव्यांची जाणीव नव्हती, की ती वक्तव्यं करणारे कोणी गवईंसारखे दलित नव्हते? गवईंच्या जागी कोणी दलितेतर न्यायमूर्तींनी अशी टिपण्णी केली असती तर तिवारीची बुट फेकण्याची हिंमत झाली असती? ज्या हिंदू धर्माच्या नावाने हा सारा खेळ सुरू आहे, त्या धर्माच्या कर्त्याकरवित्यांनी चार्वाक, लोकायत ऋषी आणि त्यानंतरच्या धर्म पंडितांनी मांडलेला तर्कवाद आणि विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन वाचला असता तर तिवारीला जगणं अवघड झालं असतं. इश्वर, आत्मा, स्वर्ग-नरक हे सारं झुट आहे, असं तत्वज्ञान सांगणार्यांनाच आजचे सनातनी आव्हान देत आहेत. देव, वेद, ब्राह्मण या व्यवस्था ही लोकांची फसवणूक असल्याचं चार्वाकांनी म्हटलं आहे. जग आणि त्यातील जीव हे पंचमहापूतांनी बनलं आहे, हे तत्वज्ञान माणसाच्या मृत्यूनंतर त्याचं अस्तित्व संपवतं, असं उघडपणे सांगतं. म्हणजेच जगण्यातील आनंद हेच अंतिम सत्य असल्याचं सांगणार्या धर्माच्या धुरीणांनी धर्मापेक्षा अनुभव आणि परंपरेपेक्षा विचार महत्वाचा मानला. जे इंद्रियांना अनुभवता येत नाही त्यांना मानू नका, या तत्वाचा अंगीकार ज्यांना नकोसा झालाय ते सनातनी पूर्वी अज्ञातांना वेडे बनवायचे. आजकाल चांगले शिकलेले तिवारींसारखेही या सनातन्यांचे पाठीराखे बनलेले पाहून देवही अश्रृ ढाळत असतील. ज्यांच्यावर हल्ले घडवले ते सारे चार्वाकांच्या आणि लोकायतांच्या पावलावर पाऊल ठेवणारंं तत्वज्ञान मांडत होते. याहून वेगळं तत्व सरन्यायाधिशांनी मांडलं, असं ज्या कोणास वाटतं अशांना मुर्खाच्या नंदनवनातील मनूच समजलं पाहिजे.
सरन्यायाधिशांवरील अशा हल्ल्याची घटना याआधी 1968 साली सर्वोच्च न्यायालयात घडल्याचे दाखले मिळतात. तो तर चाकू हल्ला होता. बुटफेकीच्या कृत्याहून कितीतरी पटीने गंभीर. मात्र तरीही त्या गंभीर घटनेची गवईंवरील हल्ल्याच्या घटनेशी बरोबरी होऊ शकत नाही. तो आपल्यातलं निर्दोषत्व दाखवण्यासाठी आरोपीने केलेला हल्ला होता. तर हा हल्ला सनातन्यांपुढे कोणीही श्रेष्ठ नाही, हे दर्शवणारा हल्ला होय. आणि तो त्या घटनेहून कितीतरी पटीने घातक आणि संविधानाला आव्हान देणारा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला आमच्याहून श्रेष्ठत्व मिळणार नाही, याची जाणीव करून देणार्या मनूच्या जमातीचं हे कृत्य होय. तेव्हाचे सरन्यायाधीश महंमद हिदायतउल्ला यांनी त्या घटनेची नोंद आपल्या ‘माय ओन बॉजवेल’ या पुस्तकात घेताना आरोपीची आगतिकताही मांडली आहे, जी या घटनेतील सनातनी कृत्याशी बरोबरी करूच शकत नाही, इतकं विकृत कृत्य तिवारीने केलंय. गवईंसारख्यांना धर्मविरोधी ठरवणारे यापूर्वीही भारतात होते. त्यांनीही टोकाची हिंमत गाठली होती. मात्र तेव्हा कायद्याचा धाक होता. अशा अतिरेकी कृत्याची किंमत मोजली जायची.
आज तो धाक आणि कायद्याची किंमत सनातन्यांना राहिलेली नाही. ते काहीही करू शकतात. स्वधर्मियांनाही ते सोडत नाहीत. इतर धर्मियांना ते रस्त्यात गाठून कुठल्याही कारणासाठी अद्दल घडवू शकतात. आज त्यांनी थेट गवईंवर हल्ला करण्याची हिंमत दाखवलीय. अशांपुढे सत्ता लाचारीने वागते तेव्हा असल्या गुंडांची हिंम्मत वाढते. सत्तेच्या साक्षीने ते कोणाचा बळी घ्यायलाही कमी करत नाहीत. ते सरन्यायाधिशांनाही अद्दल घडवू शकतात. तरीही त्यांचं काहीही वाकडं होत नाही. हेच कोण्या शकीलने, साजीद वा डिसोजाने केलं असतं तर सार्या यंत्रणा हात धुवून कामाला लागल्या असत्या. त्याला जागीच पोलीस खाक्या दाखवला गेला असता. त्याचा आरोप सिध्द होण्याआधीच त्याला यमसदनी पाठवलं गेलं असतं, त्याचं घर बुलडोझरने पाडलं गेलं असतं. त्याला जगणं हराम केलं असतं, इतका धार्मिक आणि जातीय विखार देशात फैलावला आहे. तिवारी पडला उच्च वर्णीय. दलितांना धडा शिकवण्याचा त्याला जणू मक्ताच मिळाला असावा, अशा प्रकारे त्याच्या कृत्यावर पांघरूण घातलं जाऊ लागलं. ज्याने नीच कृत्य केलं, त्याने ते कसं आणि का केलं, हे सांगणार्यांची रीघ तिवारीच्या घराकडे पोहोचली. मात्र गवईंवर झालेल्या हल्ल्याचं यातल्या एकालाही काही वाटलं नाही. गवईंवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्याची वेळ आली तेव्हा पाचजण जमले. यावरून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतं.
गवईंच्या जागी कोणी पंडित, पांडे, तिवारी असता तर? तर सारा देश ढवळून निघाला असता. सनातनी आणि सोकॉल्ड धर्मांडांनी देश डोक्यावर घेतला असता. सरकारी यंत्रणाही आरोपीच्या मागे लागल्या असत्या. देशात दलितेतरांच्या पापांच्या मोजमापाचं हे बक्षीस होय. परधर्माच्या महिलेवरील बलात्कार्यांना जामीन मिळाल्याचा उत्सव साजरा होतो आहे. अशा आरोपींवर टिपण्णी केली तर त्या न्यायाधिशाचा ब्रिजभूषण लोया केला जातो. त्यांच्या जगण्याचा हक्क हिरावून घेतला जातो आहे. विद्यमान सत्तेने इतिहासाचं विकृतीकरण करणार्यांना चांगले दिवस आणले आहेत, याचं हे द्योतक आहे. इतिहास मिटवण्यासाठी सनातन्यांना बळ दिलं जाऊ लागल्याने ते संविधान मान्य नाही, असं खुलेआम सांगतात. मात्र इतरांसाठी तो पराकोटीचा गुन्हा ठरलेला असतो. याहून व्यवस्थेचं धार्मिक आणि सामाजिक विकृतीकरण कोणतं असू शकतं?
रविवार विशेष लेख — न्यायाला अद्दल घडवणारा सनातनी खेळ…!
लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.






दुर्देव हे की ज्यांनी ज्यांनी ही कृत्य केलीत त्या सगळ्यांचे पाठीराखे सारे भाजपचे भक्त आहेत.
खजुराओतील विष्णूच्या तुटलेल्या मूर्तीबाबतच्या सुनावणीला बेदखल करताना त्यासाठी ध्यान धरा, परमेश्वरच याला ठीक करेल,
आज तो धाक आणि कायद्याची किंमत सनातन्यांना राहिलेली नाही. ते काहीही करू शकतात.