

संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यात असलेल्या चंदनापुरी घाटात आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. संगमनेरहून साकुरच्या दिशेने निघालेली एसटी बस (एमएच ०७ सी ९२५२) चंदनापुरी घाटातील एका धोकादायक वळणाजवळ साईड गटारीच्या अंदाज न आल्याने बसच्या डाव्या बाजूची चाके गटारात गेल्याने बस एका बाजूला पलटी झाली. मात्र शेजारीच डोंगर असल्याने ती डोंगरावर कलल्यामुळे या अपघातात बसमधील शालेय विद्यार्थ्यांसह १० ते १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत, तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेरहून साकुरकडे प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस जेव्हा चंदनापुरी घाटातून प्रवास करत होती, तेव्हा धोकादायक वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्यावर पलटी झाली.
अपघात होताच परिसरात एकच खळबळ उडाली. या बसमधून शालेय विद्यार्थ्यांसह अनेक प्रवासी प्रवास करत होते. मात्र, जीवितहानी टळल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातात किरकोळ जखमी झालेल्या १० ते १२ प्रवाशांना तातडीने जवळच्या वृंदावन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वांबळे यांच्यासह डोळासने महामार्ग पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती, मात्र पोलिसांच्या जलद कामगिरीमुळे वाहतूक पूर्ववत करण्यात यश आले.



मिळालेल्या माहितीनुसार,
अपघात होताच परिसरात एकच खळबळ उडाली.