संगमनेर – माजी मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. थोरात म्हणाले की, कर्डिले यांच्या निधनाने ग्रामीण विकासाची दृष्टी आणि ‘ग्रामीण शहाणपण’ असलेले लोकनेते हरपले आहेत.
अनेक वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले आणि राज्याच्या मंत्रिमंडळात दुग्धविकास मंत्री म्हणून काम केलेले शिवाजीराव कर्डिले हे जनसामान्यांची भावना जाणणारे नेतृत्व होते, असे थोरात यांनी नमूद केले. तसेच, जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांचे काम प्रभावी ठरले. मुद्देगिरीने बोलणारे आणि माणसांची कदर करणारे नेतृत्व गमावल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने जिल्ह्यातील राजकारणावर चांगली पकड असलेला एक कर्तबगार व मुसद्दी राजकारणी हरपल्याची प्रतिक्रिया दिली. बुऱ्हानपूरचे सरपंच ते राज्याचे मंत्री असा त्यांचा प्रवास प्रेरणादायी होता. आपल्या रोखठोक स्वभावाने, प्रत्येक गोष्ट हसत-खेळत घेऊन माणसं जोडण्याची त्यांची कला अनोखी होती. त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आपल्या स्वभावाने माणसे जोडली, असे डॉ. तांबे म्हणाले.












