संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्वांवर संगमनेरच्या सहकाराची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. तालुक्यातील सहकारी संस्था व त्यांच्या संलग्न संस्थांच्या माध्यमातून सभासद शेतकरी, उत्पादक, कामगार या सर्वांच्या जीवनात मोठा आनंद निर्माण झाला असून, सहकारामुळे तालुक्याच्या जीवनात मोठी आर्थिक समृद्धी आली आहे, असे मत माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. थोरात कारखान्याने कायम उच्चांकी भाव दिला असून, नुकतीच उभी राहिलेली अद्ययावत प्रशासकीय इमारत अत्यंत सुंदर व वैभवशाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दीपावलीनिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित लक्ष्मीपूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी माधवराव कानवडे, व्हा.चेअरमन पांडुरंग पा. घुले, कांचनताई थोरात, रणजितसिंह देशमुख, युवा नेते राजवर्धन थोरात, डॉ. जयश्री थोरात, डॉ. हसमुख जैन, सवी पारीख, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सुधाकर जोशी, ॲड. नानासाहेब शिंदे, अजय फटांगरे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, तालुक्यातील नागरिकांच्या जीवनात समृद्धी निर्माण व्हावी या उद्देशाने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी १९६८ मध्ये या कारखान्याची उभारणी केली. वीट, माती आणि पत्र्याच्या साहाय्याने तयार झालेल्या इमारतीमध्ये अनेक वर्षे कामकाज सुरू होते. ८०० मे.टन क्षमतेपासून सुरू झालेला हा कारखाना आता ५५०० मे. टन क्षमतेचा होऊन राज्यासाठी एक पॅटर्न ठरला आहे. सहकारी संस्थांमुळे नागरिकांच्या जीवनात समृद्धी आली असून, खेडोपाडी, गावोगावी कष्टातून शेतकऱ्यांनी आता बंगले बांधले आहेत, हीच खरी समृद्धी आहे.
याचबरोबर तालुक्यातील शिखर संस्थांनीही चांगले कामकाज करून नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. तालुक्याच्या प्रगतीसाठी आपण कायम प्रयत्न केले असून, एकेक माणूस जोडला आहे. कारखान्याची नवीन वैभवशाली इमारत अत्यंत सुंदर असून, शहराच्या वैभवात निश्चितच भर टाकणारी आहे.
जीवनामध्ये कष्ट, धावपळ, दुःख कायम असते; मात्र दीपावलीच्या काळात हे सर्व विसरून आनंदाने राहायचे असते. सर्वांनी एकत्र येऊन आनंद साजरा करायचा असतो. दिवाळी हा आनंदाचा कालखंड असून, ही दिवाळी सर्वांना आनंदाची जावो, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.
डॉ. जयश्रीताई थोरात यांनी यावेळी बोलताना सांगितले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकारी संस्थांनी नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. ८५ हजार स्क्वेअर फुटाचे हे नवीन कार्यालय अत्यंत वैभवशाली असून, देशातील इतर कारखान्यांसाठी आदर्शवत ठरणारे आहे. तर राजवर्धन थोरात यांनी ‘सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात हे ग्रेट आर्किटेक्ट (वास्तुविशारद) होते. त्यांनी सहकार आणि सहकारातील इमारतींबरोबरच माणसे उभी केली,’ असे गौरवोउद्गार काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक तसेच अकाउंट विभागाचे अमोल दिघे, संदीप दिघे, किरण कानवडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी – निवडणुकीपूर्वी सत्तेवर येण्यासाठी राज्यातील सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. राज्यात अतिवृष्टी झाली असून, पिके वाहून गेली आहेत. या शेतकऱ्यांना आता खरी मदतीची गरज आहे. शेतकरी पूर्ण अडचणीत असून, अशावेळी सरकारने संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली पाहिजे. दिवाळीला आम्ही काहीतरी करू असे सांगितले होते, मात्र अद्याप कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही काळी दिवाळी ठरली आहे. सरकारने तातडीने कर्जमाफी करावी, अशी मागणी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली.
सर्व सहकारी संस्थांमध्ये लक्ष्मीपूजन – लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कारखान्यासह राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी बँक, जिल्हा सहकारी बँक, राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनी यांसह अमृत उद्योग समूहाच्या विविध सहकारी संस्थांमध्ये लक्ष्मीपूजन करण्यात आले. याप्रसंगी भजनांचा संगीत कार्यक्रमही झाला.
लक्ष्मीपूजन… सहकारमहर्षींच्या तत्वांवर संगमनेरची वाटचाल; सहकारातून मोठी आर्थिक समृद्धी – बाळासाहेब थोरात
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कारखान्यासह राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी बँक, जिल्हा सहकारी बँक, राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनी यांसह अमृत उद्योग समूहाच्या विविध सहकारी संस्थांमध्ये लक्ष्मीपूजन करण्यात आले.




संगमनेर – 

दीपावलीनिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये

याचबरोबर तालुक्यातील शिखर संस्थांनीही चांगले कामकाज करून

शेतकऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी –