देशातील सामाजित वातावरण चांगलं आहे, असं म्हणण्याचं धाडस कोणीही करू शकत नाही. धर्माच्या आड अधार्मिक कृत्य करणार्यांवर कोणताच अंकुश नसल्याने धर्माचा आधार घेत अनेकजण देशातील सलोखा बिघडवण्याचा उघड प्रयत्न करत आहेत. अशांवर प्रशासनाचं काहीही नियंत्रण नाही. उलट पंतप्रधान मोदी आणि अमित शहांसारखे नेते अशांना फॉलो करत असल्याने त्यांची हिंमत वाढली आहे. यामुळे देशात हिंदू वगळता इतर धर्मांतील व्यक्तींना सातत्याने संकटाचा सामना करावा लागत आहे. धार्मिक तेढ निर्माण करणार्यांना सत्ताधार्यांची फूस असल्याने यंत्रणाही जणू त्यांच्यासाठीच राबत असल्याचं चित्र आजकाल आहे. यामुळे देशातील सलोख्याचं काय होईल, याची चिंता आहे. हे केवळ हिंदूतेरांबाबत घडतं असं नाही. जे सत्ताधारी भाजपच्या धर्मिक भूमिकेला विरोध करतात अशा हिंदूंनाही याची झळ बसू लागली आहे. हिंदू धर्माच्या एखाद्या व्यक्तीच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावायचा, त्याच्याविरोधात देशभर तक्रारी करायच्या, त्याला अद्दल घडवायची, असले उद्योग सर्रास घडू लागले आहेत. गोमांस विक्रीच्या निमित्ताने एखाद्याला जिवानिशी संपवणार्यांना शिक्षा होत नसेल तर कारवायांच्या अपेक्षांना काही अर्थ नाही. अखलाख अहंमद सारख्या व्यक्तीला वेचून ठार मारलं जात असताना याच गोमांसचे कत्तलखाने चालवणार्या सतीश सबरवाल, सुनील सूद यांना जाब विचारण्याची हिंमत ते दाखवू शकत नाहीत. ज्यांना कुरूळकरसारख्या देशाच्या संरक्षणाची विक्री करणार्यांचं काही वाटत नाही, त्यांना देशाच्या एकतेविषयी अस्था आहे, असं माननं भाबडेपणाचं होय. धर्माच्या नावाखाली देश बुडाला तरी त्यांना काही फरक पडणार नाही.
हे आज सांगण्याचं कारण नुकत्याच नवी मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या महिला वर्ल्डकप क्रिकेटच्या सामन्यातील विजेत्या भारतीय महिला संघातील खेळाडूंवर होत असलेली धार्मिक टीका हे आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान महिला टीमला आपल्या घरी बोलवतात, त्यांचं कौतुक करतात. स्वत:ची पाठ थोपटून घेतात आणि दुसरीकडे त्यांचेच पाठीराखे खेळाडूंना बदनाम करतात. महिला आहेत म्हणून त्यांना कमजोर समजायची मनुवादी मानसिकता संपलेली नाही, हे या ट्रोलरांनी दाखवून दिलं आहे. चूल आणि मूल इतक्याच मर्यादेत स्त्रियांनी राहिलं पाहिजे, अशा बुरसटलेल्या विचारांनी महिलेचा कधीच सन्मान केला नाही. उलट तिच्यातील दोष काढले आणि त्यांना शक्य होईल तिथे बदनाम करण्याचा प्रयत्न केला. हिंदू धर्मातीत महिलेला अशा टीकाकारांनी किती हैराण केलं ते बिल्कीस बानो प्रकरणाने बाहेर आणलं. भीक नको पण कुत्रं आवर असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली. विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट टीममधल्या अनेक मुलींना असल्या विकृत वर्तणुकीचा जागोजागी आलेला प्रत्यय पाहिला की मस्तक बधीर होतं. जेमीमा रॉड्रिक्स यातील एक. जेमीमाला जगणं मुश्कील करणार्या अवलादींनी केलेल्या अश्लाघ्य टीकेने तर हद्दच पार केली. टीममध्ये असताना होत असलेल्या टीका तिला जगणं असह्य करून सोडत होत्या. कुटुंबियांनी धीर दिला नसता तर ती भारतीय टीममध्ये दिसू शकली नसती. कुटुंबियांच्या धिराने तिने या ट्रोलकडे दुर्लक्ष केलं. ख्रिश्चन असल्याचं निमित्त करत तिला असं काही ट्रोल केलं गेलं की विचारून सोय नाही. ज्या महिलांनी भारताचं नाव जगाच्या उंचीवर नेऊन ठेवलं त्या महिलांप्रति देशातल्या प्रत्येकाला अभिमान असावा, असं ज्यांना वाटत नाही, ते खरे देशद्रोही. असल्या अवलादींवर तात्काळ कारवाई करून त्यांना जेरबंद करायची हिंमत सरकारने दाखवायला हवी.
उपांत्य फेरीतील सामन्यात संघाला अंतिम सामन्यात पोहोचवणार्या जेमीमा हिने त्या विजयानंतर येशूचे आभार मानले, इतक्याशा कारणासाठी तिच्यावर ज्या प्रकारे शाब्दिक चिखलफेक झाली ती पाहिली की देशातील विकृतांची पातळी लक्षात येते. सामान्यत: यश मिळालं की देवाचे आभार मानण्याची आपल्याकडे प्रथा आणि परंपरा आहे. परमेश्वराच्या अशीर्वादाने इथे पोहचू शकलो, असं म्हटलं म्हणून कोणाचं काही बिघडत नाही. तिथे जात्यंधांचे किडे वळवळले आणि त्यांनी जेमीमाला टीकेच्या शुळावर चढवलं. आधीच्या सामन्यात जेमीमा लवकर बाद झाली तेव्हा या मुर्खांनी तिला उद्देशून जीजस कुठे होता, असा प्रश्न करून सतावून सोडलं. जीजस रविवारी सुटीवर असतो काय, असं विचारणारा किती विकृत असेल, याची जाणीव होते. खेळाआड धर्म आणू नये, असं भले आपण म्हणत असलो तरी जाणीवपूर्वक खेळाला धर्माआड मोजणारे आपल्या देशात कमी नाहीत. जेमीमा ख्रिस्त आहे, हा तिचा दोष कसा असू शकतो? ख्रिश्चन आहे, म्हणून जेमीमाला संघात स्थान मिळालं असं जर कोणाला वाटत असेल तर ठार मूर्ख आहेत.
जातीय विष पसरवणार्यांच्या वाळवीने देश पोखरला जात असताना असल्या शक्ती त्यात खतपाणी घालतात, हे सरकारला ठावूक नाही, असं नाही. सरकार त्यांनाच प्रोत्साहित करत असल्याचं चित्र आहे. शेफाली वर्मा या विजयासाठी परमेश्वराची आठवण काढत होती. तर मनू भाकर हिला या विजयासाठी गीतेच्या ओळी आठवल्या. या खेळाडूंच्या त्या भावना आहेत. या भावनांचा आदर करणं हीच खरी हिंदू संस्कृती. परमेश्वराची आठवण काढणार्या शेफाली आणि मनू या महिलांप्रति नाचून आनंद व्यक्त करणारे जेमीमाच्या येशूच्या आठवणीने इतके क्रोधित होत असतील तर ते मानसिक रुग्ण असल्याचंच द्योतक आहे.
एकीकडे भारत आनंदाचा सोहळा साजरा करत असताना हे विकृत जात्यंध या आनंदाला धर्माधर्मात विभागत होते. गब्बर नावाच्या ट्विटर हॅण्डलने तर महिला टीमला मिळणारा पगार हा लाडक्या बहिणींना दिला पाहिजे, असं म्हणत आपल्यातल्या मनूला जागा करून दिली. भारताचा हा विजय ऐतिहासिक असल्याने त्याचा आनंद तितक्याच जोरकस होणं स्वाभाविक होतं. हा विजय सांघिक होता. तो कोणी जेमीमा वा शेफालीमुळे मिळाला नाही. मात्र त्या खेळल्या नसत्या तर यशाने झुलकावणी दिली असती, हे ही मान्यच करावं लागेल. संघातील महिला या देशातील विविध प्रांतातल्या, विविध धर्मातील असूनही त्यांनी देशाप्रति दाखवलेली जिद्द ही कौतुकास्पदच. देशाचं नाव उज्वल करण्यासाठी धडपडणार्या प्रत्येकासाठी हा विजय म्हणजे धडपडणार्या प्रत्येकासाठी प्रोत्साहन असताना ज्यांनी त्यात जीव ओतला अशांवरच कोणी टीका करत असेल तर त्यांचा बंदोबस्त करण्याची हिंमत सरकारने दाखवली पाहिजे. ते देशाचे द्रोही असल्याने त्यांच्याविरोधी गुन्हा दाखला व्हायला हवा.
अमन ज्योत हिने लाराच्या घेतलेल्या कठीणशा झेलने सामन्याचं पारडं फिरवलं. भारताच्या खेळाडूंसाठी गलेकी हड्डी बनलेल्या लाराला रोखणं ही सर्वात कठीण गोष्ट होती. अमन ज्योतने तिचा कठीण झेल घेत सामना भारताच्या बाजूने झुकवला. हा झेल अमनने काही शिखांचं नाव झळकावं म्हणून घेतला, असं कोणास वाटत असेल तर ते अर्धवटच आहेत. देशाच्या संघात असताना अनेक महिलांना स्वत:चा खर्चही भागवता येत नव्हता. त्यांना मिळणार्या महागाई भत्त्यातून घर चालत नव्हतं, पुरेसा आहार घेणंही त्यांना अवघड होतं. अशा कठीण परिस्थितीत पन्नास शतकांचा सामना खेळणं हा काही भातुकलीचा खेळ नव्हे. कर्नाटकच्या आकांक्षाने व्यक्त केलेल्या भावना याकरिताच लक्षात घेतल्या पाहिजेत. खेळ एक पण असमानता असंख्य अशा स्थितीत भारताचं नाव उज्वल करणार्यांचं कौतुक करण्याऐवजी त्यांना नाउमेद करणार्यांची करावी तेवढी किंव कमीच. पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांच्या जिवावर चालणार्या महिला क्रिकेटला सुगीचे दिवस यावेत, या स्मृती मंथानाने व्यक्त केलेल्या भावना संघाच्या एकूण अवस्थेची जाणीव करून देतात. शेफाली वर्माला तर संघात जागाही नव्हती. प्रतिका रावल जायबंदी झाल्याने शेफाली संघात आली आणि तिने चमत्कार केला. 78 चेंडूत 87 धावा काढणं हा काही ट्रोलिंगचा खेळ नाही. दिप्ती शर्माने 58 चेंडून 58 धावा घेत संघाला अंतिम सामन्यातलं स्थान घट्ट केलं. अशा प्रत्येक खेळाडूचं योगदान हे देशाचा अभिमान उचावणारं आहे. त्यांचं भरभरून कौतुक.
रविवार विशेष लेख — जेमीमाला ट्रोल करणार्या बांडगुळांनो
लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.








