अमरावती/मुंबई: जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी विखे पाटलांवर घणाघाती हल्लाबोल करत त्यांना मंत्रिमंडळातून तात्काळ हाकलून लावण्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हे, तर जो कोणी विखे पाटलांचे वाहन फोडेल, त्याला प्रहारकडून १ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची वादग्रस्त घोषणा कडू यांनी केली आहे.
“नाव कृष्णाचे आणि कृत्य कंसाचे! अशा मंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंत्रिमंडळातून हाकलून लावले पाहिजे. मला जर त्यांची गाडी दिसली, तर मीच फोडेन!” असं देखील आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
काय होते विखे पाटलांचे वक्तव्य? – काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सारखे फुकट, सारखी माफी असे कसे चालेल,’ असे विधान केले होते. याच धर्तीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही, “आधी कर्जबाजारी व्हायचे आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची, हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. सोसायटी काढायची, कर्ज काढायचे, पुन्हा कर्जबाजारी व्हायचे. पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची,” असे म्हणत शेतकऱ्यांना सुनावले होते. याच वक्तव्यामुळे बच्चू कडू यांचा संताप अनावर झाला.
बच्चू कडू यांनी संताप व्यक्त करताना म्हटले की, मुख्यमंत्री एकीकडे कर्जमाफीची घोषणा करतात, तर दुसरीकडे हे वाचाळवीर मंत्री अशी विधाने करतात. ही नालायकी आता थांबवा. लोक झोडपत नाहीत हेच नशीब समजा! राज्याच्या कृषी मूल्य आयोगाने कापसाला ११ हजार रुपये प्रति क्विंटल भावाची शिफारस केली असताना मोदी सरकारने हमीभाव केवळ ८ हजार रुपये दिला, याबद्दल त्यांनी सरकारला ‘लाज वाटली पाहिजे,’ असे सुनावले.
कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १ जुलै २०२६ पासून रेल्वे बंद पाडण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करू, असे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांचे आश्वासन पूर्ण न झाल्यास राज्यातील एकही रेल्वे धावू देणार नाही, असे ते म्हणाले.
राजू शेट्टींकडूनही सडकून टीका – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही विखे पाटलांवर टीका केली. त्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती विखेंच्या लक्षात आणून दिली. तुमच्या वडिलांनी काढलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजची फी ४.५ हजारांवरून ४.५ लाख झाली, पण उसाचा दर ३०० वरून फक्त ३ हजार झाला. फीप्रमाणे उसाला ३० हजार दर मिळाला असता, तर शेतकऱ्यांनीच कारखान्याचे कर्ज फेडले असते, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.
विखे पाटील यांची मवाळ प्रतिक्रिया – बच्चू कडूंच्या आक्रमक भूमिकेवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र मवाळ भूमिका घेतली आहे. त्यांनी कडू यांना ‘जुने मित्र’ संबोधले आहे. बच्चू भाऊ माझे जुने मित्र आहेत. पाच वर्षे मी त्यांच्या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. त्यामुळे त्यांचा स्वभाव मला आणि माझा त्यांना माहीत आहे. आमची मैत्री अजून दृढ करू. त्यांचा जो काही गैरसमज झाला आहे, तो दूर करण्यात मला यश मिळेल याची खात्री आहे, असं ते म्हणाले.
‘विखेंची गाडी फोडा, १ लाखाचं बक्षीस!’ बच्चू कडूंचा संताप, मंत्रिमंडळातून हाकलण्याची मागणी; शेतकरी विरोधी वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ
"नाव कृष्णाचे आणि कृत्य कंसाचे! अशा मंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंत्रिमंडळातून हाकलून लावले पाहिजे. मला जर त्यांची गाडी दिसली, तर मीच फोडेन!" असं देखील आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे.



अमरावती/मुंबई: जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी विखे पाटलांवर घणाघाती हल्लाबोल करत त्यांना मंत्रिमंडळातून तात्काळ हाकलून लावण्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हे, तर जो कोणी विखे पाटलांचे वाहन फोडेल, त्याला प्रहारकडून १ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची वादग्रस्त घोषणा कडू यांनी केली आहे.


