संगमनेर: संगमनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता निवडणुकीचे मैदान सोडणाऱ्या उमेदवारांची अर्थात ‘रणछोडदास’ बनणाऱ्यांची चर्चा सुरू झाली आहे. बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्याच दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली आहे. अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले असले तरी, ‘मनधरणी’नंतर अर्ज मागे घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस शुक्रवार, 21 नोव्हेंबर असल्याने, अंतिम दिवसापर्यंत किती उमेदवार निवडणुकीचे मैदान सोडून ‘रणछोडदास’ बनतात, याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.
बुधवारी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केलेल्या दिड्डी रूपाली अभिजीत आणि जहागीरआली जावेदअली सय्यद या दोन अपक्ष उमेदवारांनी तर नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरणाऱ्या डॉ. रूपाली संग्राम जोंधळे या अपक्ष महिला उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला आहे.
उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर नगराध्यक्षपदासाठी 15 उमेदवारांचे 17 अर्ज तर नगरसेवकपदासाठी 147 उमेदवारांचे 159 अर्ज पात्र ठरले होते. मात्र, छाननीमध्ये अनेक प्रमुख उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. मंगळवारी झालेल्या छाननीमध्ये माजी नगराध्यक्ष अंजली सुधीर तांबे यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षातर्फे दाखल केलेला अर्ज बाद ठरला आहे. तसेच, शिवसेनेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुवर्ण विठ्ठल राहणे यांनी दाखल केलेल्या दोन अर्जांपैकी एक अर्ज वैध ठरविण्यात आला आहे, तर गलांडे रेखा संपत यांनी दाखल केलेल्या शिवसेना आणि अपक्ष अशा दोन अर्जांपैकी शिवसेनेकडून दाखल केलेला अर्ज बाद ठरला आहे.
याशिवाय, अनेक प्रभागांमध्ये प्रमुख पक्षांचे अर्ज बाद झाले आहेत. प्रभाग 1 अ मधून पुंड हिराबाई ज्ञानेश्वर (अपक्ष) आणि प्रभाग 1 ब मधून आरोटे ऋषिकेश चंद्रकांत (अपक्ष) यांचे अर्ज बाद झाले. प्रभाग क्रमांक 2 ब मधून संगीता विलास पुंड यांचे शिवसेना आणि भाजप कडून दाखल केलेले दोन्ही अर्ज तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून दाखल केलेला मस्के सुवर्ण दत्तात्रय यांचा अर्ज बाद ठरला आहे. प्रभाग 3 अ मधून भारतीय जनता पक्षाचे फटांगरे भरत भिकाजी आणि वाकचौरे राजेश चंद्रकांत यांचे दोन्हीही अर्ज बाद झाले आहेत. प्रभाग 4 ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस कडून कानवडे प्रवीण अरुण यांचा अर्ज आणि प्रभाग क्रमांक 8 अ मधून भारतीय जनता पक्षाकडून भगत मेधा दीपक यांचा अर्ज बाद झाला आहे.
प्रभाग क्रमांक 10 अ मधून अपक्ष उमेदवार जुबेदा निहाल पिंजारी यांचा अर्ज, प्रभाग क्रमांक 11 ब मधून अपक्ष उमेदवार शेख शहबाज गफार यांचा दोनपैकी एक अर्ज तसेच याच प्रभागातील अपक्ष उमेदवार शेख असीम अहमद अशपाक यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. प्रभाग 13 ब मधून भारतीय जनता पक्षातर्फे अर्ज करणारे उपरे मुकुंद मुरलीधर यांचा पक्षाकडून भरण्यात आलेला अर्ज बाद झाला आहे, मात्र त्यांचा अपक्ष असलेला अर्ज कायम ठेवण्यात आला आहे. याच प्रभागातील अपक्ष उमेदवारी करणाऱ्या बिचकर योगेश वसंत यांचाही एक अर्ज अवैध ठरला आहे. प्रभाग 14 ब मधून भारतीय जनता पक्षाकडून दाखल केलेला गौरव सुभाष मालपाणी आणि शिवसेनेकडून दाखल केलेला सोनाली दिलीप बोटवे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला आहे. तर प्रभाग 15 ब मधील अपक्ष उमेदवार सहिदा गफार शेख यांचा अर्जही बाद झाला आहे.
शुक्रवारी माघारीची अंतिम मुदत संपल्यानंतर संगमनेर नगरपरिषद निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
निवडणूक माघारीचा ‘अखेर’चा दिवस जवळ; ‘रणछोडदास’ बनणाऱ्यांकडे नजरा! २१ अर्ज बाद, पहिल्याच दिवशी तिघांची माघार; संगमनेरच्या राजकारणात मोठा सस्पेन्स
शुक्रवारी माघारीची अंतिम मुदत संपल्यानंतर संगमनेर नगरपरिषद निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.



संगमनेर: संगमनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता निवडणुकीचे मैदान सोडणाऱ्या उमेदवारांची अर्थात ‘रणछोडदास’ बनणाऱ्यांची चर्चा सुरू झाली आहे.
याशिवाय, अनेक प्रभागांमध्ये प्रमुख पक्षांचे अर्ज बाद झाले आहेत.

