महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर
नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर संगमनेर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीच्या (भाजप-शिंदे गट) सभेसाठी जागा आरक्षित करण्याच्या नावाखाली, संगमनेर सेवा समितीच्या जाहीर सभांसाठी प्रशासनाकडून जाणीवपूर्वक जागा नाकारल्याचा गंभीर आरोप सेवा समितीने केला आहे. सभांसाठीच्या या जागा ‘ब्लॉकिंग’च्या धक्कादायक घडामोडींमुळे प्रशासनावर राजकीय ‘दबाव’ असल्याच्या चर्चांना उधाण आले असून, आगामी निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात होतील का, असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सेवा समितीने २७ नोव्हेंबर रोजी नवीन नगर रोड येथील मैदानावर सभेसाठी परवानगी मागितली होती, मात्र प्रशासनाने महायुतीच्या प्रचारासाठी येणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा नियोजित असल्याने ही मागणी थेट नाकारली.
परंतु, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, २७ नोव्हेंबरसह २८ नोव्हेंबरची तारीखही महायुतीकडून ‘ब्लॉक’ केल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे. विशेषतः, २८ तारखेला महायुतीची कोणतीही सभा नसतानाही ही जागा रोखून ठेवल्यामुळे, सेवा समितीला मैदान मिळू नये हाच एकमेव हेतू असल्याचा संशय नागरिक व राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
सेवा समितीने प्रशासनाकडे २८ नोव्हेंबरला जागा रिकामी असल्यास परवानगी देण्याची विनंती केली होती, पण ‘जागा मिळणार नाही,’ असे रूक्ष उत्तर प्रशासनाने दिल्याचे समितीचे म्हणणे आहे.
या सर्व घडामोडींवरून प्रशासनावर प्रचंड राजकीय दबाव असल्याचे स्पष्ट झाले असून, निवडणुकांपूर्वीच जागा अडवून निवडणूक वातावरण दूषित करण्याचा हा प्रयत्न असल्याची नाराजी शहरात उघडपणे व्यक्त होत आहे.
‘दडपशाही’चा आरोप: माजी उपनगराध्यक्ष किशोर पवार यांचा थेट हल्लाबोल – माजी उपनगराध्यक्ष किशोर पवार यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर संतप्त प्रतिक्रिया देत, हा ‘राजकीय दडपशाहीचा नवा अध्याय’ असल्याचे म्हटले आहे. संगमनेर सेवा समितीला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सभेची जागा अडवून जनता थांबेल असे त्यांना वाटते, पण जनतेच्या मनात असलेली आमची जागा कुणीही अडवू शकत नाही. संगमनेरच्या राजकारणात अशा प्रकारची राजकीय दडपशाही कधीच नव्हती. याला येथील सुज्ञ जनता निश्चितच योग्य उत्तर देईल.
इतर मैदानांवरही प्रशासनाचा ‘वेट ॲण्ड वॉच’ – प्रशासनाने नवीन नगर रोड येथील जागा नाकारल्यानंतर सेवा समितीने शहराच्या इतर मैदानांसाठीही अर्ज केले. मात्र, प्रशासनाने त्यावरही अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे महायुतीच्या सत्तेच्या दबावापुढे प्रशासनाने नमते घेतल्याचे चित्र निर्माण झाले असून, निष्पक्ष निवडणुकांसाठी प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शहरभर जोर धरू लागली आहे.
‘दडपशाही’चा नवा अध्याय: संगमनेरात विरोधकांच्या सभेला जागा नाकारल्याने राजकीय वातावरण तापले! – निष्पक्ष निवडणुकीवर गंभीर प्रश्नचिन्ह
माजी उपनगराध्यक्ष किशोर पवार यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर संतप्त प्रतिक्रिया देत, हा 'राजकीय दडपशाहीचा नवा अध्याय' असल्याचे म्हटले आहे



महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर
परंतु, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, २७ नोव्हेंबरसह २८ नोव्हेंबरची तारीखही
‘दडपशाही’चा आरोप: माजी उपनगराध्यक्ष किशोर पवार यांचा थेट हल्लाबोल