

संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर नगर परिषदेच्या 15 प्रभागांमधील 30 जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीतील प्रभाग 1 ब, 2 ब, 15 ब या उर्वरित तीन जागांसाठीचे निवडणूक चित्र बुधवारी संध्याकाळी अखेर स्पष्ट झाले आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबलेल्या या जागांसाठी आता शनिवारी, 20 डिसेंबरला मतदान होणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने लढतींचे स्वरूप निश्चित झाले आहे. यात प्रभाग 1 ब मधून लोंढे संकेत सुभाष, तर प्रभाग 15 ब मधून शेख रेहाना सिराजोद्दीन आणि सईदा गफ्फार शेख यांनी अर्ज मागे घेतले आहेत. प्रभाग 2 ब मधून मात्र कोणीही माघार घेतली नाही.
माघारीनंतर उर्वरित तीन जागांवर खालीलप्रमाणे लढती होणार आहेत –
प्रभाग 1 ब मध्ये सरळ लढत होत असून ही लढत सर्वात लक्षवेधी ठरणार असून, संगमनेर सेवा समितीचे उमेदवार माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड आणि शिवसेना (शिंदे गट) उमेदवार अभिजीत पुंड यांच्यात कांटे की टक्कर होणार आहे.
प्रभाग 2 ब मध्ये चौरंगी लढत होत असून या जागेवर चार महिला उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यात संगमनेर सेवा समितीच्या दिघे अर्चना सुभाष, शिवसेना शिंदे गटाच्या इंदिरा शशांक नामन, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या म्हस्के सुवर्णा दत्तात्रेय आणि अपक्ष उमेदवार सुजाता महेश ऐनगंदुल यांचा समावेश आहे.
प्रभाग 15 ब मध्ये तिरंगी लढत होत असून या महिला राखीव जागेवर संगमनेर सेवा समितीच्या पठाण नसीमबानो इसहाकखान यांची लढत अपक्ष उमेदवार पठाण जुलेखा निसारखान व शेख दिलशाद अजीज यांच्याशी होत आहे.
प्रतिष्ठेची लढाई: तांबे विरुद्ध खताळ! – या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून, तर आमदार अमोल खताळ यांनी शिवसेना-भाजपकडून उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही आमदारांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली असून, पालिका ताब्यात घेण्यासाठी त्यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे.
दरम्यान, 2 डिसेंबरला 27 जागांची आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर, आता या सर्व जागांचा अंतिम निकाल प्रशासनाने निश्चित केलेल्या तयारीनुसार 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. या निकालातून कोणता आमदार ‘सरस’ ठरतो आणि संगमनेर नगर परिषदेवर कोणाचे वर्चस्व प्रस्थापित होते, हे स्पष्ट होणार आहे. तूर्तास तरी नियोजनबद्धरीत्या तांबे यांच्या पॅनेलने आघाडी घेतल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. पालिका कोणाच्या ताब्यात? हे 21 डिसेंबरला ठरणार आहे.



माघारीनंतर उर्वरित तीन जागांवर खालीलप्रमाणे लढती होणार आहेत – 
प्रतिष्ठेची लढाई: तांबे विरुद्ध खताळ!