संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) –
संगमनेर तालुका बिबट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे भयभीत झाला असून, नरभक्षक बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी उद्या सोमवारी, (१५ डिसेंबर) २०२५ संगमनेरात भव्य जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनी ही माहिती दिली.

सोमवारी सकाळी दहा वाजता संगमनेर बस स्थानक ते प्रांताधिकारी कार्यालय यादरम्यान हा जन आक्रोश मोर्चा हजारो संगमनेर करांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या संगमनेर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे शेतकरी, नागरिक आणि लहान मुलांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. या वाढत्या हल्ल्यांमुळे अनेक नागरिकांना जखमी व्हावे लागले आहे, तर शनिवारी संध्याकाळी जवळेकडलग येथील लहानग्या सिद्धेशला बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत वारंवार मागणी करूनही सरकार आणि वन विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने ‘बिबट्यामुक्त संगमनेर तालुका’ या मागणीसाठी हे तीव्र आंदोलन करण्यात येत आहे.
बिबट्या हटाव आंदोलन समितीच्या वतीने डॉ. जयश्रीताई थोरात यांनी तालुक्यातील तमाम जनता, महिला, युवक आणि शेतकऱ्यांनी या निर्णायक लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन केले आहे. बिबट्यांच्या वाढत्या दहशतीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हा ‘जन आक्रोश मोर्चा’ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.





