
संगमनेर, प्रतिनिधी
बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या अवघ्या २२ वर्षीय विवाहितेचा सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अकोले शहरात घडली आहे. विशेष म्हणजे बाळ सुखरूप असले तरी, प्रसूतीच्या आनंदाऐवजी या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली असून, नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांवर उपचारात घोर हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला आहे.
रुपाली विठ्ठल गोधडे (रा. आश्वी खुर्द, संगमनेर) असे मृत मातेचे नाव आहे. प्रसूतीसाठी त्या माहेरी आल्या होत्या. गर्भधारणेचे नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर प्रसूती वेदना सुरू झाल्याने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाळ सुखरूप जन्माला घातले. मात्र, त्यानंतर रुपाली यांची प्रकृती अचानक खालावली.
प्रकृती अत्यंत गंभीर बनल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने पुढील उपचारांसाठी रुपाली यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालय (लोणी) येथे हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, लोणी येथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी रुपाली यांना मृत घोषित केले.

रुपाली यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या सासर आणि माहेरच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रुपाली यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘रुपाली यांची प्रकृती खालावत असतानाही डॉक्टरांनी उपचारांत निष्काळजीपणा केला. वेळेवर आणि योग्य उपचार न मिळाल्यानेच रुपालीचा मृत्यू झाला’, असा थेट आरोप नातेवाईकांनी केला आहे.
या घटनेमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर, रात्री उशिरा मृतदेह ताब्यात घेऊन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रुपाली यांचे कुटुंबीय अत्यंत गरीब आदिवासी समाजातील आहे. बाळंतपणाच्या आनंदाच्या क्षणाची वाट पाहणाऱ्या या कुटुंबावर कर्त्या महिलेचा मृत्यू झाल्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एका बाजूला नवजात बाळाच्या जन्माचा आनंद, तर दुसऱ्या बाजूला आईच्या निधनाचे दु:ख अशी भीषण परिस्थिती या कुटुंबावर ओढवली आहे.
नातेवाईकांच्या गंभीर आरोपांमुळे, आता आरोग्य विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन निष्काळजीपणा करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करणे आवश्यक बनले असल्याने आरोग्य विभाग काय भूमिका घेतो याकडे लक्ष लागले आहे.



