संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)-
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यात मंजूर झालेली आणि नंतर राजकीय कारणास्तव रद्द करण्यात आलेली रस्ते कामे पुन्हा मार्गी लागली आहेत. एकूण ३०.५७० किलोमीटरपैकी १५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना राज्य सरकारने नव्याने प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले असून, यामुळे तालुक्यातील चार मोठ्या ग्रामीण भागांतील दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे.
राजकीय वळणांनंतर कामांना पुन्हा संजीवनी– लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी ४ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तालुक्यातील ८ महत्त्वाचे रस्ते मंजूर करून घेतले होते. मात्र, ७ ऑगस्ट २०२५ रोजी एका अनपेक्षित निर्णयाद्वारे शासनाने या सर्व कामांची प्रशासकीय मान्यता रद्द केली होती. विकासकामांना मिळालेली स्थगिती आणि त्यानंतर रद्द झालेली मंजुरी यामुळे तालुक्यात संताप व्यक्त होत होता.
आमदार सत्यजीत तांबे यांनी ही बाब गांभीर्याने घेत ग्रामविकास मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांनी वैयक्तिक भेट घेऊन या रस्त्यांचे महत्त्व पटवून दिले. अखेर शासनाने १४ नोव्हेंबर रोजी नवीन आदेश काढून ४ मुख्य रस्त्यांना पुन्हा मान्यता दिली आहे.
या ४ रस्त्यांच्या कामांचा मार्ग मोकळा– पुन्हा मंजुरी मिळालेल्या १५ किलोमीटरच्या कामांमध्ये खालील रस्त्यांचा समावेश आहे:
डिग्रस – रणखांबवाडी
मिर्झापूर – धांदरफळ खुर्द
साकुर – बिरेवाडी
तासकरवाडी – खंडेरायवाडी

उर्वरित १५ किलोमीटरसाठी लढा सुरूच राहणार- लोकांच्या सोयीसाठी मंजूर झालेली कामे रद्द करणे विकासविरोधी होते. आम्ही मंत्र्यांकडे वस्तुस्थिती मांडली आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, अद्याप उर्वरित १५ किलोमीटरची कामे (चिखली, खरशिंदे, पारेगाव आणि शिंदोडी परिसर) प्रलंबित आहेत. ही कामे देखील मंजूर होईपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील.– सत्यजित तांबे, आमदार








