
संगमनेर, प्रतिनिधी-
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर विकासाच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिले आहे. आता याच विकासप्रक्रियेत भर घालत संगमनेर शहरातील नागरिकांसाठी आमदार सत्यजित तांबे यांनी एक मोठा दिलासा मिळवून दिला आहे. आमदार तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेर नगरपालिकेत थकीत मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफीसाठी ‘अभय योजना’ अखेर सुरू झाली असून, यामुळे शहरातील हजारो मालमत्ताधारकांना सुमारे २ कोटी रुपयांच्या शास्तीकरातून मुक्तता मिळणार आहे.
अधिवेशनातील आवाज आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट- नगरपरिषद कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरील शास्तीमुळे सामान्य नागरिकांवर कराचा मोठा बोजा पडत होता. अनेकदा नागरिक शास्तीची रक्कम भरत असूनही ती घरपट्टीमध्ये समाविष्ट केली जात नव्हती, ज्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत होता. हा तांत्रिक पेच सोडवण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेच्या अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अधिवेशनात वारंवार आवाज उठवला. केवळ सभागृहात प्रश्न न मांडता, त्यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन यातील तांत्रिक त्रुटी दूर करण्याची आणि शास्तीकर माफ करण्याची आग्रही मागणी केली होती.

तांत्रिक अडचणी दूर, २ कोटींची शास्ती माफी- आमदार तांबे यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून नगरपालिका कार्यक्षेत्रातील आयडब्ल्यूबीपी (IWBP) योजनेतील त्रुटी दूर करून आता अभय योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत संगमनेर नगरपालिकेत सुमारे २ कोटींची शास्ती करमाफी केली जाणार आहे. वर्षानुवर्षे थकीत असलेल्या कराचा भार यामुळे हलका होणार असून, विशेषतः ज्या नागरिकांच्या मालमत्ता अनधिकृत बांधकामांच्या कक्षेत होत्या, त्यांना या तांत्रिक सुधारणेचा मोठा लाभ मिळणार आहे.
नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन- संगमनेर नगरपरिषद नागरिकांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा आणि लाभ देण्यासाठी कटिबद्ध आहे. तांत्रिक अडचणींमुळे शास्तीकराचा जो बोजा नागरिकांवर होता, तो आता या अभय योजनेमुळे दूर झाला आहे, असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपला थकीत कर भरून शास्तीतून मुक्त व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.



