
संगमनेर, प्रतिनिधी-
पिंपळे पाझर तलावातून दोन्ही गावांसाठी रब्बी हंगामाचे पाणी शुक्रवारी (९ जानेवारी) सोडण्यात आले. आमदार अमोल खताळ यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन जलसंपदा विभागाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या, ज्याची अंमलबजावणी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यामुळे संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव आणि पारेगाव परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चिंचोली गुरव व पारेगाव परिसरात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने पिंपळे पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. मात्र, रब्बी हंगामातील गहू, हरभरा व इतर पिके सध्या पाणीअभावी धोक्यात आली होती. पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्यास हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. ही समस्या मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य रविदास सोनवणे आणि पारेगाव येथील भाजपचे सुरेश दळवी यांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची कल्पना दिली होती.
आमदार खताळ यांनी या निवेदनाची तत्काळ दखल घेत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना पिंपळे पाझर तलावातून रब्बीचे आवर्तन सोडण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यांच्या या सूचनेनंतर प्रशासकीय यंत्रणेने हालचाली करत शुक्रवारी प्रत्यक्ष पाणी सोडले. यामुळे चिंचोली गुरव आणि पारेगाव येथील शेकडो एकर शेतीला जीवदान मिळणार असून पिकांचे नुकसान टळणार आहे.
पाणी सोडण्याच्या वेळी महायुतीचे पदाधिकारी, दोन्ही गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी ऐन वेळी उपलब्ध करून दिल्याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांचे विशेष आभार मानले आहेत.





