संगमनेर –
संगमनेर शहरात चॉपरने हल्ला करून एका तरुणाचा हात निकामी केल्याच्या गंभीर प्रकरणात, संशयित आरोपी वैष्णव संजय आव्हाड याला अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेक बी. गव्हाणे यांनी हा निर्णय दिला असून, केवळ घटनास्थळी उपस्थित असल्याच्या कारणावरून अटक करणे आवश्यक नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
घटनेचा पार्श्वभूमी आणि पोलिसांचा आरोप संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर १०२५/२०२५ नुसार, निशांत उर्फ बंटी नंदू आरगडे आणि वैष्णव आव्हाड यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मुख्य आरोपी बंटी आरगडे याने पीडिताच्या हातावर चॉपरने जोरदार वार केला होता, ज्यामध्ये पीडिताने आपल्या डाव्या हाताचा पंजा गमावला. पोलिसांनी असा दावा केला होता की वैष्णव आव्हाड हा घटनेच्या वेळी तिथे उपस्थित होता आणि त्याने मुख्य आरोपीला पळून जाण्यास मदत केली होती, त्यामुळे त्याची कोठडी मिळणे आवश्यक आहे.
न्यायालयाचा युक्तिवाद आणि निर्णय सुनावणी दरम्यान अर्जदाराच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की एफआयआरमध्ये वैष्णव आव्हाड याच्या विरोधात कोणतीही स्पष्ट भूमिका किंवा हिंसक कृती नमूद केलेली नाही. तो केवळ घटनास्थळी उपस्थित होता आणि पीडित व्यक्ती स्वतः आरोपींच्या जवळ आली होती. महत्त्वाचे म्हणजे, घटनेच्या आदल्या दिवशी झालेल्या वादातही वैष्णवचा कोणताही सहभाग नव्हता आणि त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. या बाबी लक्षात घेता, तो केवळ १९ वर्षांचा तरुण असल्याने आणि तपासात सहकार्य करण्यास तयार असल्याने न्यायालयाने त्याला दिलासा दिला.
न्यायालयाने ५०,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. या सवलतीसह अर्जदाराला २१ जानेवारी २०२६ पासून सलग १० दिवस संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, प्रकरणातील साक्षीदारांवर कोणताही दबाव टाकू नये आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडू नये, अशा अटीही घालण्यात आल्या आहेत. आरोपीतर्फे ॲड. राजू बबनराव खरे व ॲड. विजय देवगिरे यांनी काम पाहीले.







