अहिल्यानगर, २६ जानेवारी
संगमनेर तालुक्यातील धार्मिक आणि सामाजिक चळवळीचे केंद्र असलेल्या श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान (खळी) आणि श्री क्षेत्र विठोबा देव मंदिर (धांदरफळ बु.) या दोन देवस्थानांना शासनाकडून अधिकृतपणे ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर करण्यात आला आहे.
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, आमदार सत्यजीत तांबे यांनी यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे मोठे यश मिळाले आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे आता या दोन्ही देवस्थानांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या विशेष दर्जामुळे जिल्हा नियोजन समिती आणि तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या माध्यमातून देवस्थान परिसरासाठी मोठा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीचा विनियोग भाविकांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, सुसज्ज अंतर्गत रस्ते, विद्युत व्यवस्था, भव्य सभामंडप, भक्तनिवास आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी केला जाणार आहे. केवळ भौतिक सुविधाच नव्हे, तर सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण पावले उचलणे आता शक्य होणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार सत्यजीत तांबे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत. आमदार तांबे यावेळी म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी नेहमीच दूरदृष्टी ठेवून योजना राबवल्या आहेत. त्याच वारशातून श्री क्षेत्र खंडोबा आणि श्री क्षेत्र विठोबा या देवस्थानांना हा दर्जा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. या विकासामुळे केवळ भाविकांची गैरसोय दूर होणार नाही, तर धार्मिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळून स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.
या निर्णयाचे धांदरफळ व खळी येथील ग्रामस्थांनी तसेच यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे. देवस्थानच्या विकासासाठी आणि गावाच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. येणाऱ्या काळात या निधीतून होणारी कामे संगमनेरच्या धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर या दोन्ही गावांना मानाचे स्थान मिळवून देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात महत्त्वपूर्ण योजना राबवल्या. श्री क्षेत्र खंडोबा आणि श्री क्षेत्र विठोबा धांदरफळ हे संगमनेर तालुक्यातील एक महत्त्वाचे देवस्थानाचे ठिकाण आहे. या तीर्थक्षेत्राला ‘क’ वर्ग दर्जा मिळाल्यामुळे देवस्थान पर्यटनाला चालना मिळेल. – आमदार सत्यजीत तांबे







