संगमनेर, प्रतिनिधी –
राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आणि ‘विकासपुरुष’ अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून, राज्याने एक कणखर आणि विकासाला गती देणारे नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत आमदार अमोल खताळ यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
आमदार अमोल खताळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली शोकसंवेदना व्यक्त करताना सांगितले की, अजितदादा पवार हे प्रशासनावर मजबूत पकड असणारे आणि जनतेसाठी अखंड झटणारे नेतृत्व होते. त्यांची निर्णयक्षमता, कार्यतत्परता आणि स्पष्टवक्तेपणा कायम स्मरणात राहील. माझी राजकारणातील सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमधून झाली असून राजकीय व सामाजिक जीवनात काम करताना दादांचे मार्गदर्शन मला सातत्याने लाभले. त्यांनी दिलेले संस्कार, मूल्ये आणि शिकवणीतूनच मी घडत गेलो. स्वतः एक उत्तम मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील एक तेजस्वी पर्व संपले आहे.
या भीषण अपघातात दिवंगत झालेल्या सर्व सहकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आमदार खताळ यांनी पवार कुटुंबीय व त्यांच्या आप्तेष्टांच्या दुःखात मनापासून सहभागी असल्याचे म्हटले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून ईश्वर मृतांच्या आत्म्यास चिरशांती देवो, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील तेजस्वी पर्व संपले; अजितदादांच्या निधनाने कधीही न भरून निघणारी पोकळी – आ. अमोल खताळ
माझी राजकारणातील सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमधून झाली असून राजकीय व सामाजिक जीवनात काम करताना दादांचे मार्गदर्शन मला सातत्याने लाभले. त्यांनी दिलेले संस्कार, मूल्ये आणि शिकवणीतूनच मी घडत गेलो.

