संगमनेर, प्रतिनिधी –
तमाशा ही महाराष्ट्राची जिवंत लोककला असून, या क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या रघुवीर खेडकर यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर राज्यभरातील तमाम लोककलावंतांचा खऱ्या अर्थाने सन्मान आहे, असे गौरवपूर्ण उद्गार माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.
पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल लोक कलावंत रघुवीर खेडकर यांच्या संगमनेर येथील कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या ऐतिहासिक नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, प्रसिद्ध उद्योगपती राजेश मालपाणी, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, प्रा. एस. झेड. देशमुख, डॉ. सोमनाथ मुटकुळे, डॉ. संजय दळवी, हिरालाल पगडाल यांच्यासह खेडकर कुटुंबीय आणि शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात संगमनेरच्या सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करत सांगितले की, कवी अनंत फंदींपासून ते विठ्ठल उमप, पवळा हिवरगावकर आणि गुलाबबाई संगमनेरकर यांच्यापर्यंत या भूमीला मोठी कला परंपरा लाभली आहे. १८५७ चा उठाव, स्वातंत्र्यलढा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोककलावंतांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. विशेषतः कोरोनासारख्या कठीण काळातही खेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांची आणि कलेची साथ सोडली नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात नवी आव्हाने पेलत त्यांनी ही कला जिवंत ठेवली असून, पद्मश्री च्या माध्यमातून आज ते खऱ्या अर्थाने देशाचे कलावंत झाले आहेत, याचा संगमनेरकरांना सार्थ अभिमान आहे.
या सत्काराला उत्तर देताना पद्मश्री रघुवीर खेडकर अत्यंत भावूक झाले होते. हा पुरस्कार मला मिळाला आहे असे मला आजही वाटत नाही, तर हे महाराष्ट्रातील रसिकांचे प्रेम आहे. संगमनेर ही माझी कर्मभूमी असून या मातीने मला जगण्याचे संस्कार दिले. संगमनेर हीच माझी आई आणि बाप आहे. आपला अखेरचा प्रवासही येथेच व्हावा, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वयाच्या नवव्या वर्षी रंगमंचावर आल्यापासूनचा संघर्षमय प्रवास आठवताना आणि हा दैदिप्यमान सोहळा पाहताना आईची उणीव भासत असल्याचे सांगताच त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. महाराष्ट्रातील रसिक आणि संगमनेरकरांच्या प्रेमामुळेच मी इथवर पोहोचलो असून हा पुरस्कार खऱ्या अर्थाने रसिकांचाच असल्याचे त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी यावेळी सरकारकडे तमाशा कलावंतांसाठी आर्थिक अनुदानाची मागणी केली. ते म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी विकासाचा पाया रचला आणि बाळासाहेब थोरात यांनी तो वारसा समर्थपणे पुढे नेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी आधी कांताबाई सातारकर आणि आता रघुवीर खेडकर यांच्या पद्मश्रीसाठी प्रयत्न केल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना, आगामी काळात बाळासाहेब थोरात पुन्हा सत्तेत येतील, अशी भावनिक इच्छाही व्यक्त केली.
आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, तमाशा ही महाराष्ट्राची ओळख असून या पुरस्कारामुळे या लोककलेचा गौरव झाला आहे. या यशामुळे नव्या पिढीतील कलावंतांना मोठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले तर डॉ. जयश्रीताई थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रघुवीर खेडकर यांचे आगमन होताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि शिस्तबद्ध परेडने त्यांना मानवंदना देण्यात आली. ‘नटरंग उभा’ या गीताच्या सुरावटीत झालेल्या या सोहळ्यात खेडकर यांनी व्यासपीठावरून खाली उतरून प्रेक्षकांना घातलेला दंडवत हा सर्वांच्या मनाला स्पर्शून गेला. खेडकर यांच्या या साधेपणाने आणि कृतज्ञतेने उपस्थित रसिकांचे डोळे पाणावले होते. या हृदयस्पर्शी सोहळ्याने संगमनेरच्या सांस्कृतिक इतिहासात एक सुवर्णपान जोडले गेले आहे.
रघुवीर खेडकरांचा ‘पद्मश्री’ हा महाराष्ट्राच्या मातीतील सर्व लोककलावंतांचा सन्मान – माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
'संगमनेर हीच माझी आई आणि बाप' - खेडकर यांच्या भावूक उद्गारांनी संगमनेरकर भारावले



संगमनेर, प्रतिनिधी – 
या सत्काराला उत्तर देताना पद्मश्री रघुवीर खेडकर अत्यंत भावूक झाले होते.
