अकोले:
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या अन्यायाविरोधात लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ज्या प्रेरणेमुळे त्या काळात सर्व समाज महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि स्वराज्याप्रति अतुलनीय निष्ठा दाखवली, त्या प्रेरणेचा शोध घेण्याची आज खऱ्या अर्थाने आवश्यकता निर्माण झाली आहे. आजचा समाज तोच असला, तरी शिवरायांच्या काळातील समाजातील विविध घटकांनी जी निष्ठा जपली, ती आजच्या समाजात तितकीशी दिसून येत नाही, असे प्रतिपादन अकोले तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी केले.
तालुक्यातील गणोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी येथे आयोजित शिवजयंती उत्सव, शाळेच्या संरक्षक भिंतीचा भूमिपूजन समारंभ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी अनिल गायकवाड, केंद्रप्रमुख सुनील घुले, सरपंच संतोष आंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि राजमाता जिजाऊ वंदनाने करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना अरविंद कुमावत पुढे म्हणाले की, शिक्षकांनी जर एकोप्याने आणि जिद्दीने काम केले तर शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडू शकतो. शिंदेवाडी शाळेने अवघ्या चार महिन्यांत ‘सी एस आर’ फंड मिळवून विकासकामे हाती घेतली, ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. संरक्षक भिंत, स्वच्छता गृह, वाचनालय आणि शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ या गोष्टी इतर शाळांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील. येणाऱ्या काळात शिंदेवाडी शाळा ही अकोले तालुक्यातील ‘वाबळेवाडी शाळा’ म्हणून ओळखली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्याध्यापिका वृषाली कडलग यांनी प्रास्ताविकात माहिती दिली की, मुंबई येथील ‘उमंग फाउंडेशन’तर्फे शिंदेवाडी शाळेला बिबट्यापासून संरक्षण मिळण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याकरिता ‘सी एस आर’ निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी गणोरे ग्रामपंचायतचे सरपंच संतोष आंबरे व ग्रामसेवक अशोक बलसाने यांनी शाळेला ‘इंटरेक्टिव बोर्ड’ देणगी म्हणून जाहीर केला. तसेच रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे माजी अध्यक्ष ऋषिकेश मोंढे यांनी स्टील कपाट, अमोल पानसरे यांनी भाषणासाठीचा पोडियम, तर शिक्षिका कल्पना पाटील यांनी शाळेला काचफलक भेट दिला. जिजाऊ ब्रिगेडच्या डॉ. दीपाली पानसरे, डॉ. श्रद्धा वाणी आणि साहित्यिक संतोष खेडलेकर यांनी नूतन वाचनालयासाठी पुस्तके भेट दिली. याप्रसंगी शिवरायांची भव्य प्रतिमा साकारणारे चित्रकार राजेंद्र बागुल व संजय बागुल यांचा कुमावत यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य संत नामदेव आंबरे, विकास सोसायटीचे चेअरमन अशोक आहेर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अंबादासजी दातीर, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र आंबरे, ग्रामसेवक अशोक बलसाने, सोमनाथ आहेर, शांताराम आंबरे, विशाल आंबरे, संदीप आंबरे, गणेश भालेराव, संतोष भालेराव, सचिन शिंदे, भूषण शिंदे, यशवंत हांडे, भगवान हांडे, विजय दातीर, पोपट आहेर, प्रकाश आहेर, तुकाराम दातीर, भारत आंबरे, प्रवीण आंबरे, बाळासाहेब आहेर, अनिल दातीर, भाऊसाहेब आंबरे, बंडू आंबरे, श्रीकांत खतोडे, भगवान खतोडे, प्रशांत दातीर उपस्थित होते. महिला वर्गातून अंगणवाडी सेविका शांताताई हांडे, माया मालुंजकर, उज्वला हांडे, मीनाक्षीताई हांडे, अनिता हांडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका वृषाली कडलग, सहशिक्षिका कल्पना पाटील, राजेंद्र आंबरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगंबर दातीर, दत्तात्रय हांडे, सचिन शिंदे, भूषण शिंदे, विशाल आंबरे, गणेश भालेराव, संदीप आंबरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी मीनाक्षीताई हांडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन दातीर यांनी केले तर उपस्थितांचे आभार कल्पना पाटील यांनी मानले.
छत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणेचा शोध घेण्याची आज गरज – गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत
आजचा समाज तोच असला, तरी शिवरायांच्या काळातील समाजातील विविध घटकांनी जी निष्ठा जपली, ती आजच्या समाजात तितकीशी दिसून येत नाही





