संगमनेर, प्रतिनिधी –
निळवंडे डाव्या कालव्याच्या माध्यमातून कासारे येथील पाझर तलावात पाणी सोडण्यात आल्याने या भागातील शेतीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. रविवारी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या पाण्याचे विधिवत पूजन करून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, लोहारे-कासारे आणि मेंढवण हा परिसर पूर्वीपासूनच दुष्काळाच्या झळा सोसत आला आहे. अनेक पिढ्यांनी येथे भीषण पाणीटंचाई अनुभवली असून, येथील शेती पूर्णपणे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून होती. अनेकदा पाझर तलाव कोरडे राहत असल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाया जात असत.
मात्र, आता राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खंबीर नेतृत्वामुळे या भागाला हक्काचे पाणी मिळाले आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी हे पाणी खऱ्या अर्थाने ‘संजीवनी’ ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
लोहारे-कासारे शिवारातील काथ नदीवर लघु पाटबंधारे विभागामार्फत सन १९६६ मध्ये या पाझर तलावाची उभारणी करण्यात आली होती. या तलावाची एकूण साठवण क्षमता ४३.२८ दशलक्ष घनफूट इतकी असूनही, पावसाअभावी ही क्षमता कधीच पूर्णपणे वापरता आली नव्हती. यंदा मात्र या तलावात २९.०३० दशलक्ष घनफूट इतका महत्त्वपूर्ण जलसाठा उपलब्ध झाला आहे. या साठ्यामुळे लोहारे, कासारे आणि मेंढवण या तीन गावांतील तब्बल १७८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामुळे या भागात आता पारंपरिक पिकांऐवजी गहू, हरभरा आणि भाजीपाल्यासारखी नगदी पिके घेण्याचा आत्मविश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाऱ्यांद्वारे पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेल्या दुरुस्ती कामांचे प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या भागाला कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा मिळवून देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
कार्यकारी अभियंता प्रीतम शेवाळे यांनी यावेळी माहिती दिली की, तलावाची उभारणी होऊन अनेक वर्षे उलटली तरी त्यात नियमित पाणी येत नव्हते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे. भविष्यातही हा प्रकल्प सातत्याने कार्यरत राहील, याकडे विभाग लक्ष देईल.
या जलपूजन सोहळ्याला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कवडे, दिलीप पोकळे, अण्णासाहेब सोमवंशी, दत्तू पोकळे, विजय पोकळे, नवनाथ कानकाटे, रमेश कानकाटे, घनश्याम भास्कर, दीपक कदम, बाळासाहेब पोकळे, शिवाजी पोकळे, वाल्मीक पोकळे, गोरख पोकळे, शुभम पोकळे, सुधीर पोकळे, विजय दिघे, मोहन पोकळे, चंदू कारले, सागर कारले, दिलीप गायकवाड, नाना कारले, बाळासाहेब कारले, यमनाथ कारले, रघु कारले, रामनाथ बोऱ्हाडे, मेंढवण येथील शरद यलमामे आणि बाळासाहेब बढे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





