अहिल्यानगर:
सोशल मीडियावर सध्या ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ या नावाने एक पत्रक मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून हे पत्रक पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहे.
या पत्रकाद्वारे असा दावा केला जात आहे की, १ मार्च २०२० नंतर ज्या मुलांच्या एका किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू झाला आहे, अशा १८ वर्षांखालील मुलांना दरमहा ४ हजार रुपयांची मदत दिली जाईल. या अफवेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि तालुका स्तरावरील शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत असून शासकीय कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत.
प्रशासनाने यासंदर्भात महिला व बाल विकास विभाग तसेच समाज कल्याण विभागाकडून अधिकृत माहिती घेतली असता, राज्यात अशी कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याचे समोर आले आहे. व्हायरल होत असलेल्या पत्रात कागदपत्रांची यादी आणि संपर्क क्रमांक देऊन नागरिकांची दिशाभूल करण्यात आली आहे.
अशा फसव्या माहितीवर विश्वास न ठेवता, शासकीय योजनांच्या खात्रीसाठी केवळ अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच, अशा प्रकारची खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला असून, नागरिकांनी कोणत्याही अज्ञात व्यक्तीला आपली वैयक्तिक माहिती किंवा पैसे देऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.





