संगमनेर: विशेष प्रतिनिधी
संगमनेर शहर, तालुका ग्रामीण, घारगाव आणि आश्वी या चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत होणाऱ्या अमली पदार्थ तस्करीच्या तपासात मोठे गौडबंगाल असल्याचे बोलले जात असून, तपासाच्या नावाखाली केवळ धूळफेक सुरू आहे की काय, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीने तरुणाईला विळखा घातला असतानाच, आता या संपूर्ण काळ्या धंद्यात चक्क खाकीचाच वरदहस्त असल्याचे समोर आले आहे. यातून जिल्हा पोलीस दलातील एलसीबीच्या एका कर्मचाऱ्याला तुरुंगात जाऊन निलंबनाला तर दोघांना गुटखा प्रकरणी बदलीला सामोरे जावे लागले आहे.
विशेष म्हणजे, विधानसभेत आमदार अमोल खताळ व काशिनाथ दाते यांनी अहिल्या नगर जिल्ह्याशी संबंधित हा प्रश्न लावून धरल्यानंतर पोलीस दलातील ‘काळेबेरे’ उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील संगमनेरमधील या प्रकरणासंदर्भात वारंवार आवाज उठविला आहे. मात्र पोलिसांकडून या गुन्ह्यांचे समूळ उच्चाटन होताना दिसत नाही.
संगमनेर तालुक्यात गांजा, गर्द, ड्रग्स आणि हेरॉईनसारख्या जीवघेण्या अमली पदार्थांचे जाळे कोळ्याच्या जाळ्यासारखे पसरले आहे. वरिष्ठांच्या पथकांनी छापे टाकले, कोट्यवधींचा माल जप्त केला आणि गुन्हेगारही पकडले. मात्र, स्थानिक पोलिसांच्या ताब्यात तपास जाताच या गुन्ह्यांची धार बोथट होते, हा आजवरचा अनुभव आहे. तपासात जाणीवपूर्वक ठेवल्या जाणाऱ्या तांत्रिक त्रुटींमुळे सराईत गुन्हेगार न्यायालयातून सहज जामीन मिळवून मोकाट फिरत आहेत. धक्कादायक बाब अशी की, जे आरोपी पकडले जातात, तेच जामिनावर सुटून पुन्हा तोच धंदा निर्धोकपणे सुरू करतात. ही यंत्रणेची हलगर्जी आहे की गुन्हेगारांना वाचवण्यासाठी रचलेली ‘फिक्सिंग’, असा संशय आता कायदेतज्ज्ञांकडूनही व्यक्त केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाला आता राजकीय वळणही मिळाले आहे. ड्रग्ज तस्करीत सापडलेले अनेक मोहरे हे बड्या राजकीय पक्षांशी संबंधित असल्याने पोलिसांचे हात बांधले गेले आहेत की त्यांना तपासापासून रोखले जात आहे, याची चर्चा नाक्यानाक्यावर सुरू आहे. बाहेरच्या पथकांनी केलेल्या कारवायांमध्ये स्थानिक पोलिसांनी पुढे काय प्रगती केली, याची माहिती गुप्त ठेवली जात असल्याने व या अनुषंगाने वेगवेगळ्या चर्चा समोर येत असल्याने संशयाची सुई अधिक गडद झाली आहे. सराईत गुन्हेगारांना न्यायालयाकडून दिलासा मिळेल अशीच भूमिका तपास अधिकारी घेत असल्याचा खळबळजनक आरोप काही कायदेतज्ञांनी केला आहे.
संगमनेरमधील आतापर्यंतच्या या गुन्ह्याच्या तपास प्रकरणाची सूत्रे थेट पोलीस अधीक्षकांनी, अप्पर अधीक्षकांनी हाती घेण्याची वेळ आली आहे. संगमनेर उपविभागामधील संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव, आश्वीसह राजुर व अकोले पोलीस ठाण्यांमधील अमली पदार्थांच्या तपासाची फेरचौकशी होऊन, तपासात त्रुटी ठेवणाऱ्या आणि गुन्हेगारांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावरील स्टार उतरवण्याची गरज आहे. जर रक्षकच भक्षक बनून या विषारी धंद्याला खतपाणी घालत असतील, तर संगमनेरची तरुणाई उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आता अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर अधीक्षक सोमनाथ वाघचौरे या ‘खाकी’तील तस्करांच्या समर्थकांवर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
खाकीचा वरदहस्त की गुन्हेगारांशी हातमिळवणी? संगमनेरातील अमली पदार्थाच्या गुन्ह्याच्या तपासावर प्रश्नचिन्ह
संगमनेरमधील आतापर्यंतच्या या गुन्ह्याच्या तपास प्रकरणाची सूत्रे थेट पोलीस अधीक्षकांनी, अप्पर अधीक्षकांनी हाती घेण्याची वेळ आली आहे.





