संगमनेर, प्रतिनिधी-
पंचायत समितीमधील एका सीआरपी महिलेच्या मानधनाचा प्रश्न आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याकडून झालेली कथित गैरवर्तणूक यावरून संगमनेरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि पीडित महिलेची तक्रार पोलीस प्रशासनाने दाखल करून घ्यावी, या मागणीसाठी शेकडो महिलांनी संगमनेर शहर पोलीस स्थानकासमोर तब्बल चार तास ठिय्या आंदोलन केले.
गेल्या दहा महिन्यांपासून सीआरपी म्हणून कार्यरत असलेल्या संबंधित महिलेचे मानधन थकीत होते. हे मानधन मिळवण्यासाठी ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेली असता, त्यांच्याकडून गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकारानंतर संबंधित महिलेचे पती आणि सामाजिक कार्यकर्ते शरद नाना थोरात यांना माहिती मिळताच काही युवक कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला. त्यानंतर ही महिला तक्रार देण्यासाठी पोलीस स्थानकात गेली असता, रात्री दोन वाजेपर्यंत तिला ताटकळत ठेवण्यात आले. रात्री राजकीय दबाव आल्यामुळे तक्रार घेतली गेली नाही आणि सकाळी येण्यास सांगण्यात आले, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता पुन्हा तक्रार देण्यासाठी गेल्यावरही पोलिसांनी टाळाटाळ केल्याने महिलांमध्ये संतापाची लाट उसळली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक समीर बारवकर यावेळी उपस्थित होते.
या आंदोलनामध्ये माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पद्माताई थोरात, अर्चनाताई बालोडे, प्रमिलाताई अभंग, सुनिता कांदळकर, दिपाली वर्पे, रोहिणी गुंजाळ, डॉ अनुराधा सातपुते, सुनिता कांदळकर, सुरभी मोरे, निशा कोकणे, संगीता थोरात, सुनिता दिघे, मंगल काकड, अनिता काकड, वनिता यादव, नंदा यादव, लता यादव, वनिता विधाटे, कल्पना थोरात, निर्मला थोरात, ज्योती थोरात, सविता थोरात, शोभा थोरात, दीपिका थोरात, ऋतुजा थोरात, यमुनाबाई मनले, अलका शिरसाठ यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या. यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
आंदोलनादरम्यान उपस्थित महिलांनी पोलीस प्रशासनाच्या उदासीनतेवर जोरदार टीका केली. सोशल मीडियावरील किरकोळ पोस्टवर कारवाई करणाऱ्या पोलिसांना महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारी का दिसत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. चार तास चाललेल्या या आंदोलनामुळे तालुक्यात नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
यावेळी बोलताना दुर्गाताई तांबे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. लोकशाहीमध्ये महिलांच्या रक्षणासाठी कायदा असतानाही, संगमनेर तालुक्यात महिलांना सतत त्रास दिला जात असून त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा दिला जात असला तरी प्रत्यक्षात महिला असुरक्षित आहेत, असे त्या म्हणाल्या. पोलीस प्रशासनाने राजकीय दबावाला बळी न पडता पीडित महिलेची तक्रार तातडीने नोंदवून घ्यावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली.
दरम्यान, पंचायत समितीच्या कामकाजाबाबतही तालुक्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि विविध महिला कर्मचाऱ्यांना राजकीय कार्यक्रमांसाठी सक्तीने बोलावले जात असल्याचा आरोप केला जात आहे. तालुक्यात वाढती वाळू तस्करी, अमली पदार्थांची विक्री आणि गुंडागर्दी यांसारख्या समस्यांमुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात आल्याची चर्चा सर्वत्र सुरू असून, प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





