संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर तालुक्याचा भौगोलिक विस्तार मोठा असून पठार भाग, प्रवरा पट्टा आणि तळेगाव पट्टा अशा तीन विभागांत हा तालुका विभागलेला आहे. पर्जन्यछायेच्या प्रदेशामुळे तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असून, उन्हाळ्याची तीव्रता वाढताच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत शासनाच्या मदतीची प्रतीक्षा न करता, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून टंचाईग्रस्त ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला आहे. एक कुटुंबप्रमुख म्हणून जनतेच्या अडीअडचणीला धावून जाण्याची आपली परंपरा थोरात यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा जपली आहे.
संगमनेर तालुक्यासह उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांसाठी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, या ध्येयाने माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अनंत अडचणींवर मात करून निळवंडे धरण आणि कालव्यांची कामे पूर्णत्वास नेली आहेत. निळवंडेच्या पाण्यामुळे अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी, उन्हाळ्याच्या दिवसांत उंचावर असलेल्या पठार भागातील काही वाड्या-वस्त्यांवर आजही टंचाई जाणवते. यावर उपाय म्हणून राजहंस दूध संघाचे चार टँकर सध्या गुंजाळवाडी पठार, वरुडी पठार, सारोळे पठार आणि डोळासने यांसारख्या दुर्गम भागात अविरतपणे पाणी पुरवत आहेत. टँकर गावात येताच पाणी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत असून, या सुविधेमुळे नागरिकांची भटकंती थांबली आहे.
विशेष म्हणजे, ‘येताना पाणी घेऊन यायचे आणि जाताना दूध घेऊन जायचे’ असा स्तुत्य उपक्रम राजहंस दूध संघाने राबविला आहे. ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांमुळे तालुक्यात आर्थिक समृद्धी आली, त्यांच्याच अडचणीच्या काळात मदतीचा हात देण्याची भूमिका संघाने घेतली आहे. निळवंडे धरणाचे निर्माते म्हणून बाळासाहेब थोरात यांनी कालव्यांच्या वरील बाजूच्या शेतकऱ्यांनाही पाणी मिळावे यासाठी पायाभूत आखणी करून ठेवली असून, ती मार्गी लावणे आता नव्या सरकारची जबाबदारी आहे. तोपर्यंत सहकाराच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्याचे काम अविरत सुरू आहे.
संगमनेर तालुका हा १७१ गावे आणि २५८ वाड्या-वस्त्यांचा एक मोठा परिवार आहे. या परिवारातील प्रत्येक सदस्याला सुविधा मिळाव्यात यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे थोरात यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.📌 उन्हाळ्याची तीव्रता आणि जनतेची मागणी लक्षात घेऊन बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार तातडीने हे टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राजहंस दूध संघाने सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या कार्याबद्दल पठार भागातील ग्रामस्थांनी व्यवस्थापनाचे आणि थोरात यांचे विशेष आभार मानले आहेत. – रणजितसिंह देशमुख, अध्यक्ष राजहंस दूध संघ.





