संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी सोमवारी सकाळी धांदरफळ, डेरेवाडी, निमज यांसह विविध गावांतील नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली.
नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसलेल्या या भागातील महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विलंब न लावता तातडीने सरसकट पंचनामे पूर्ण करावेत, जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत मिळेल, असे स्पष्ट निर्देश आमदार खताळ यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, डेरेवाडी, गोडसेवाडी, निमज आणि राजापूर या गावांमध्ये गारपिटीने गहू, कांदा, टोमॅटो, मका आणि डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले असून उभी पिके जमिनीदोस्त झाली आहेत.
धांदरफळ बुद्रुक अंतर्गत येणाऱ्या डेरेवाडी येथील संजय शिवाजी साबळे यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने आदिती संजय साबळे ही मुलगी जखमी झाली असून तिच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भास्कर आल्हाट यांच्या घराचे पत्रे उडाल्याची आणि वर्षा भीमराज गोर्डे यांचे घर कोसळल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच निमज येथील महानुभाव पंथाच्या आश्रमावरील पत्रेही वादळी वाऱ्याने उडून गेले आहेत.
पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार खताळ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यामध्ये धांदरफळ खुर्द येथील सिंधुबाई देवगिरे यांच्या डाळिंब बागेचे, भास्कर कोकणे यांच्या टोमॅटो पिकाचे, तर निमज येथील कृषीभूषण तुकाराम गुंजाळ यांच्या डाळिंब बागेसह श्यामराव किसन कासार यांच्या गव्हाच्या पिकाचे झालेले नुकसान त्यांनी प्रत्यक्ष पाहिले.
या प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश मंडलिक, राजेश गुंजाळ यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





