संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर तालुक्यातील पठार भागात दुचाकीला कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या दिवंगत विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील कलावंतांवर जमावाने हल्ला केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या भीषण प्रकारात महिला कलावंतांनाही मारहाण करून त्यांचा विनयभंग करण्यात आला असून, कलावंतांची रोकडही लुटण्यात आली आहे.
बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील वरुडी पठार शिवारात ही घटना घडली. संबंधित तमाशा फड पोखरी बाळेश्वर (ता. संगमनेर) येथील कार्यक्रम आटोपून माळेगाव पठार येथे पुढील कार्यक्रमासाठी वाहनांतून जात होता. वाटेत वरुडी पठार येथील एका पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहने थांबली असताना, एका दुचाकीस्वाराने तमाशाच्या वाहनाला कट मारला. यावरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले.
दुचाकीस्वाराने आपल्या साथीदारांना बोलावून घेत अवघ्या काही मिनिटांत ५० ते ६० जणांचा जमाव गोळा केला. या जमावाने तमाशा कलावंतांना बेदम मारहाण करत महिलांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांचा विनयभंग केला. तसेच कलावंतांकडील रोकडही चोरून नेल्याची माहिती विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित नारायणगावकर यांनी दिली आहे.
या घटनेमुळे राज्यभरातील तमाशा आणि लोककलावंतांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून, अनेक कलावंतांनी मोठ्या संख्येने एकत्रित येत घारगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी सांगितले की, ‘डायल ११२’ वर संपर्क झाल्यानंतर पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू असून, आरोपींची ओळख पटवून त्यांना कठोर कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल.






