संगमनेर, प्रतिनिधी-
केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, तर संगमनेरमध्ये महायुतीचे आमदार आहेत. असे असतानाही, संगमनेरमध्ये भारतीय जनता पक्षाची झालेली वाताहात सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. एकेकाळी विधानसभा निवडणुकीपर्यंत तालुक्यात प्रभावी असलेला हा पक्ष आज स्वतःच्याच अस्तित्वासाठी धडपडत असल्याचे नगरपालिका निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
पूर्वी सत्तेत नसतानाही प्रभावी कामगिरी करणारा हा पक्ष, आता सत्तेच्या केंद्रस्थानी असूनही पालिका निवडणुकीमध्ये भोपळाही फोडू न शकल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काय होणार अशा विवंचनेत पक्षाचे काही निष्ठावंत पदाधिकारी सापडले आहे.
संगमनेरमधील भाजपच्या या घसरणीला पक्षांतर्गत गटबाजी आणि महायुतीतील समन्वयाचा अभाव हे प्रमुख कारण मानले जात आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीचे घटक पक्ष कागदावर एकत्र असले, तरी प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात विसंवाद दिसून येतो. विधानसभा निवडणुकीच्या काळात डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपच्या माध्यमातून केलेली मोठी बांधणी वाया गेली आणि ऐनवेळी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. नाममात्र पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता तालुक्यात ताकद नसलेल्या शिवसेनेला जागा मिळाल्याने पालकमंत्री विखेंच्या मर्जीतील भाजपच्या अमोल खताळांना निवडणुकीत शिवसेनेकडून उतरवले गेले. आणि संगमनेरच्या राजकीय इतिहासात प्रथमतः ऐतिहासिक विजय मिळवत विरोधकांना यश मिळाले. हे यशच नंतर पक्षाच्या वाताहातीला कारणीभूत ठरले आहे.
भाजपच्या या पडझडीमागे पक्षातीलच काही नेत्यांची मनमानी कारभाराची वृत्ती जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. वर्षानुवर्षे पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या सक्षम कार्यकर्त्यांना डावलून घेतलेले निर्णय पक्षाला महागात पडले आहेत. विशेषतः शहराध्यक्षपदावर अनपेक्षितपणे महिलेची नियुक्ती करणे आणि ‘आम्ही सांगू तीच पूर्व दिशा’ अशी भूमिका घेणाऱ्या काही स्थानिक नेत्यांमुळे पक्षात मोठी दरी निर्माण झाली आहे. या अन्यायी धोरणांमुळेच, ज्यांच्याकडून विजयाची अपेक्षा होती, अशा अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी ऐनवेळी अपक्ष उमेदवारी लढवत केवळ स्वतःचाच नव्हे तर पक्षाचादेखील पराभव घडवून आणला. याचा फटका केवळ भाजपलाच नाही, तर संपूर्ण महायुतीला बसला असून, शिवसेना (शिंदे गटाच्या) केवळ एका नगरसेविकेपर्यंत महायुतीचे संख्याबळ मर्यादित राहिले आहे.
सध्याच्या परिस्थितीत पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासमोर पक्ष सावरण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. संगमनेर विधानसभेत चाळीस वर्षानंतर प्रथमच सत्तांतर घडवून आणल्यानंतर या चाळीस वर्षाच्या इतिहासानंतर प्रथमत:च संगमनेर नगरपालिकेमध्ये पक्षाचा नगरसेवक दिसत नसल्याने पक्षीय कार्यकर्त्यांसाठी ही लाजिरवाणी बाब असल्याचे म्हटले जात आहे.
पक्षात आपणच सर्वस्व असल्याचा आभास निर्माण करणाऱ्या काही मंडळींमुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचे चित्र आहे. जर वेळीच पक्षांतर्गत गटबाजी मोडीत काढून निष्ठावान कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही, तर संगमनेरमधील भाजपचे अस्तित्व पूर्णपणे नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता या पराभवानंतर भाजप नेतृत्व आत्मपरीक्षण करून पक्ष पुन्हा उभारी घेतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही संगमनेरात भाजपाची दयनीय अवस्था; नेत्यांच्या गटबाजीमुळे अस्तित्वाचा प्रश्न
याचा फटका केवळ भाजपलाच नाही, तर संपूर्ण महायुतीला बसला असून, शिवसेना (शिंदे गटाच्या) केवळ एका नगरसेविकेपर्यंत महायुतीचे संख्याबळ मर्यादित राहिले आहे.

