महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे अकरा वर्षीय शाळकरी मुलीवर झालेल्या भीषण ॲसिड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांचा नियोजित अहिल्यानगर जिल्हा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे. मंत्री तटकरे या शनिवारी संध्याकाळी लोणी येथे येऊन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पीडित मुलीची आणि तिच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेणार होत्या. या दौऱ्यामुळे पीडित कुटुंबाला मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र आता दौरा रद्द झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
येथील वडगाव पान परिसरात १७ मार्च रोजी शाळेतून घरी परतणाऱ्या एका चिमुरडीच्या चेहऱ्यावर अज्ञात व्यक्तीने ॲसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेला बराच कालावधी उलटूनही संगमनेर आणि जिल्हा पोलीस प्रशासनाला या हल्ल्यामागील सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात अद्याप यश आलेले नाही. गुन्हेगाराचा कोणताही मागमूस पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आरोपी मोकाट असल्याने परिसरात भीतीचे वातावरण असून, पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गुन्हेगाराची माहिती देणाऱ्यास दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करूनही अद्याप प्रशासनाला ठोस धागेदोरे मिळालेले नाहीत.
अशा गंभीर परिस्थितीत मंत्री अदिती तटकरे यांचा दौरा ही पीडित कुटुंबासाठी महत्त्वाची घडामोड मानली जात होती. मात्र, प्रशासनाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मंत्री तटकरे यांचा हा नियोजित दौरा रद्द झाला आहे. दौरा रद्द होण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. या अनपेक्षित प्रकारामुळे पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत राजकीय स्तरावरून मिळणारा पाठिंबा लांबणीवर पडल्याची भावना व्यक्त होत आहे. आता या प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासन किती गांभीर्याने घेते आणि आरोपीला कधी जेरबंद करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






