महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
भोंदूगिरी आणि तोतया पोलिसांच्या मदतीने एका महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅप्टन अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच या नवीन गुन्ह्याने नाशिक शहरात खळबळ उडाली असून फसवणुकीचे हे स्वरूप एखाद्या चित्रपटातील कथानकासारखे भासत आहे.
४० लाखांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या डोंबिवलीतील एका महिला व्यावसायिकाला बाबूराव जाधव नावाच्या व्यक्तीने नाशिकच्या विठोबा जाट या भोंदूबाबाबद्दल माहिती दिली होती. दैवी शक्तीच्या साहाय्याने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून या महिलेला नाशिकला बोलावण्यात आले. सातपूर परिसरातील अमृत गार्डन येथे सुरुवातीला विधी करून महिलेचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर मुख्य पूजेसाठी तिला सापुतारा परिसरातील निर्जन डोंगरदऱ्यात नेण्यात आले. तेथे दोन कोटी रुपये तयार झाल्याचा बनाव रचून भोंदूबाबाने नोटांनी भरलेल्या बॅगा दुरूनच दाखवल्या.
महिला त्या बॅगाजवळ जात असतानाच अचानक चार तोतया पोलिसांची तेथे एन्ट्री झाली. त्यांनी कारवाईची भीती दाखवून महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या महिलेला वाचवण्याचे नाटक करत भोंदूबाबा, दलाल आणि तोतया पोलिसांनी प्रकरण मिटवण्यासाठी पैशांची मागणी केली. या संपूर्ण गोंधळात संबंधित महिलेचे ५ लाख ६० हजार रुपये घेऊन ही टोळी फरार झाली. फसवणुकीची ही बाब लक्षात येताच महिलेने सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
या तक्रारीवरून पोलिसांनी विठोबा जाट, बाबूराव जाधव आणि अन्य चार तोतया पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी विठोबा जाट याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अशा आंतरराष्ट्रीय रॅकेटवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.






