महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर
बहुचर्चित ठरलेल्या काकडी-सुकेवाडी गांजा कारवाईतील न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आरोपीचा जामीन अर्ज संगमनेरचा अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आरोपीचा मुक्काम आता कोठडीतच राहणार आहे.
अटकेत असलेल्या प्रथमेश सुरेश गोलवड या आरोपीने आपल्या वकिलामार्फत संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. शेख यांच्या न्यायालयासमोर या जामीन अर्जासंदर्भात सुनावणी झाली.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, १ मार्च २०२६ रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शिर्डीकडून संगमनेरकडे येणाऱ्या एका स्विफ्ट डिझायर कारचा पाठलाग करून काकडी परिसरात पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईत कारमधून २१ किलो ४९० ग्रॅम अमली पदार्थ म्हणजेच गांजा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८१/२०२६ नुसार एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीच्या वतीने न्यायालयात असा युक्तिवाद करण्यात आला की, तो १२ वीत शिकणारा विद्यार्थी असून त्याचे करिअर धोक्यात येईल. तसेच ती कार त्याच्या मालकीची नसल्याने त्याला त्यातील अमली पदार्थाबाबत कोणतीही माहिती नव्हती आणि पोलिसांनी कारवाई करताना कायदेशीर तरतुदींचे पालन केले नाही, असा दावाही करण्यात आला.
जप्त केलेला गांजा हा बिया आणि पानांसह मोजल्यामुळे त्याचे वजन व्यावसायिक मर्यादेपेक्षा जास्त दाखवण्यात आले आहे, प्रत्यक्षात ते कमी असू शकते, असाही युक्तिवाद करण्यात आला. मात्र सरकारी पक्षाने या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला. आरोपीने संगनमताने गंभीर गुन्हा केला असून, या गुन्ह्यात अन्य व्यक्तींचाही समावेश असण्याची शक्यता असल्याने तपास अद्याप तपास सुरू असल्याचे सरकारी वकिल ॲड. संजय वाकचौरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. शेख यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, आरोपीकडून जप्त करण्यात आलेला अमली पदार्थाचा साठा हा व्यावसायिक स्वरूपाचा असल्याने या प्रकरणात एनडीपीएस कायद्याचे कलम ३७ लागू होते. या कायद्यानुसार आरोपी निर्दोष असल्याचे मानण्यास सध्यातरी कोणतेही ठोस कारण दिसत नाही. तसेच तपासादरम्यान आरोपीने स्वतः कबूल केले आहे की, तो आणि त्याचा साथीदार संगमनेर व श्रीरामपूर भागात गांजाची विक्री करत होते. या गुन्ह्याचे गांभीर्य आणि समाजावर होणारा परिणाम लक्षात घेता, तसेच आरोपीचा गुन्ह्यातील सक्रिय सहभाग पाहता त्याला जामीन देणे योग्य ठरणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले असले तरी आता तपासात काय समोर येते हे तपास अधिकाऱ्यांच्या मेहनतीवरून स्पष्ट होणार आहे.






