शेतकऱ्यांचे गेट बंद आंदोलन, दोघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
पिकअप गाडी पुढे-मागे घेण्याच्या कारणावरुन संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी दुपारी व्यापारी आणि त्याच्या नातेवाईकाकडून मारहाण करण्याची घटना घडली. तालुक्यातील रणखांब येथील शेतकरी किरण बारवे यांना झालेल्या मारहाणीमूळे शेतकऱ्यांनी संबधितांवर कारवाईसाठी दोन तास कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेटबंद आंदोलन केले. पोलीस प्रशासनाने केलेली कारवाई आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेतले गेले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नाशिक-पुणे मार्गावर वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला होता. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटना घडली त्यावेळी वाहतुक पोलिसांनी प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे घटनास्थळी पोलिसांना पाचारण करावे लागले. शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या संबधित मुजोरांना अटक केली जात नाही तोपर्यत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी व्यापाऱ्यासह त्याच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल केला. तपासाअंती संबधित पळून गेल्याचे समोर आल्याने पोलिसांना संबधितांना अटक करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान या शेतकऱ्याला मारहाण होऊनही बराच वेळ झाला तरी बाजार समितीचे पदाधिकारी गेटवर न आल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

‘दरम्यान बाजार समितीत ग्रामीण भागात शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीची घटना सर्वत्र पसरली. त्यामुळे संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, उपनिरीक्षक बाळासाहेब यादव, पोलीस कर्मचारी सचिन उगले, राजेंद्र डोंगरे आदींनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करून शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तर राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपील पवार, युवासेनेचे गुलाब भोसले, रणजित ढेरंगे, पप्पु कानकाटे, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद पवार आदींनी देखील घटनास्थळी येत यासंबधी माहिती घेतली. बाजार समिती प्रशासनासह व्यापाऱ्यांनादेखील जाब विचारला. शेतकऱ्यांच्या जीवावर मोठ्या होणाऱ्या व्यापाऱ्यांनी जर शेतकऱ्यांवर अन्याय केला तर त्यांना त्याचपध्दतीने उत्तर देण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विना परवाना व्यापारी माल भरत असल्याचा आरोपही यावेळी शेतकऱ्यांनी केला. या पार्श्वभूमीवर लवकरच शेतकरी आणि व्यापाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिले. पोलिसांनी व्यापारी आयुब पठाण व अरबाज पठाण या दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरापर्यत आरोपींचा शोध सुरू असून पोलीस पथक त्त्यांच्या शोधासाठी कुरण येथे गेल्याची माहीती मिळाली.



