महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रतिपादन
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
राज्यात गेल्या अडीच वर्षात केवळ लुटीचा एकमेव कार्यक्रम सुरू होता. त्यातून वाळूमाफिया आणि बगलबच्चे यांना मोकळे रान मिळाले होते. त्याला नव्या सरकारच्या काळात अटकाव आला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या मनातील सरकार सत्तेत आले असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्या हस्ते संगमनेरमध्ये सुरू असलेल्या चौपदरीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष स्थानावरून मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र पाटील, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम यांच्यासह राजेंद्र गोंदकर, रविंद्र अनासपुरे, नितीन दिनकर, सुनिल वाणी, भाजपचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले, माजी नगरसेवक जावेद जहागीरदार, शिरीष मुळे, योगराज सिंह परदेशी, ॲड. बापूसाहेब गुळवे, गोकुळ लांडगे, दीपक भगत, मेधा भगत, सिताराम मोहरीकर, डॉ. अरुण इथापे, अमोल खताळ, किशोर नावंदर आदी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, आपल्या हितसंबंधी लोकांच्या उद्धारासाठी संगमनेरमधून जाणाऱ्या नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या मूळ नकाशात बदल करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. ते पूर्ववत करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाशी चर्चा केली जात आहे. तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या कार्यकाळात या कामाची सुरुवात झाली. आता राज्य सरकारने देखील याला मदत करण्याचे ठरवले आहे.

विश्वगुरु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे देश काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत प्रगतीच्या महामार्गावर आहे. देशात रस्ते, रेल्वे व पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाले आहे.

संगमनेर येथील या राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या रुंदीकरण व चौपदरीकरणाच्या कामांसाठी केंद्र सरकारने २४ कोटी ५६ लाख व राज्य सरकार ७ कोटी उपलब्ध करून दिले आहेत. राज्याच्या विकासासाठी केंद्राच्या निधीचे मोठे योगदान असते. त्याशिवाय कोणताही विकासाचा कार्यक्रम पुढे जात नसतो असेही ते म्हणाले.


