महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
गेल्या ८ वर्षामध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये अमृतकाळ निर्माण झाला. यापूर्वी देशात अनेक पक्षांची सरकारं सत्तेवर होती. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच योजनांची वेळेत पुर्तता, सुरु असलेल्या योजनांचे कामं वेळेत पूर्ण करणे, यामुळेच देशामध्ये प्रथमच गरीबाला न्याय मिळत असून, यापूर्वीचे सरकार आणि मोदींचे सरकार यामध्ये निश्चितच फरक दिसत असल्याची माहिती केंद्रीय अन्नप्रक्रीया आणि जलशक्ती विभागाचे राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी दिली.

लोकसभा प्रवास योजनेच्या पार्श्वभूमीवर पटेल यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघात मागील दोन दिवसांपासून दौरा सुरु केला आहे. संगमनेर येथे त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या योजनांची अंमलबजावणी तसेच देशात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.

यावेळी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे प्रभारी रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, सरचिटणीस सुनिल वाणी, जालिंदर वाकचौरे आदी उपस्थित होते.
काँग्रेसच्या सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेवर टीका करत पटेल म्हणाले, कॉग्रेस पक्षाकडे आता नेतृत्व राहिलेले नाही. ज्यांच्याकडे नेतृत्व क्षमता, समज नाही ते आज देशभरात काँग्रेसची यात्रा घेवून निघाले आहेत. मात्र जे पार्टी जोडू शकत नाहीत ते देश काय जोडणार? असा सवाल करत या पक्षाला देशाच्या नव्हे तर स्वत:च्या अस्तित्वाची चिंता निर्माण झाली आहे. सत्तेपासून दूर गेल्यामुळे हा पक्ष बेचैन झाला आहे. ८० चे दशक असो की, आत्ताचे ज्या-ज्या वेळेस काँग्रेस सत्तेपासून दूर गेली त्यावेळेस या पक्षाने राष्ट्रविरोधी शक्तीशी हातमिळवणी करण्यासही मागेपुढे पाहिले नाही. पीएफआय संघटनेवर बंदी घातल्यानंतर कोणतीही प्रतिक्रीया या पक्षाकडून पुढे आली नाही. त्यामुळेच या पक्षाला आता देशापेक्षा स्वत:च्या अस्तित्वाची अधिक चिंता सतावत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहेच, महागाई कमी करण्याची जबाबदारीसुद्धा सरकारने स्विकारली असून देशातील जनतेचे जीवन अधिक सुकर होण्यासाठी त्यांना विविध योजनांचा आधार देण्याचे महत्वपूर्ण काम केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु आहे. अमेरिकेप्रमाणे भारतातही आता महिला आर्थिक क्षेत्रात करीत असलेल्या वेगवेगळ्या यशस्वी प्रयोगांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला निश्चितच बळ मिळेल.

